Friday, 24 January 2020

‘शिल्पकवडा मूर्तीकार’ किशोर सोनवणे

आयुष्यात घडणाऱ्या ‘दैवी योगायोगांवर’ फारसा विश्वास दाखवला जात नाही. तशा योगाचा अनुभव आल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियात करणे हे अलिकडे विवादाचे कारण होते. ‘दैवी’ या शब्दाला विरोध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनवाले, देव न मानणारे निधर्मी, देवादिकांच्या स्तोमाला विरोध करणारे बि ग्रेडी आणि देवादिकांशी संबंधित ब्रह्मवृंदाला सतत शिव्याशाप मोजणारे नव्या पिढीतील संशोधक हे चेकाळल्यागत प्रतिक्रिया (कमेंट) नोंदविण्यासाठी सरसावतात. अनुभव सांगणाऱ्यास अभिव्यक्त होण्याचा अधिकार नाकारत स्वतःच्या प्रतिक्रियांना अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मानत, नको त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या टोळ्या समाजमाध्यमात सक्रिय आहेत. अशा ‘ट्रोलर’ मंडळींच्या भाऊगर्दीत आपण अनुभवलेल्या दैवीयोगाचा किस्सा ‘वाजवून’ सांगणे आवश्यक असते. माझ्याबाबतीत तसाच एक अनुभव काल शुक्रवारी आला. तो यावेळी सांगतो.

Thursday, 16 January 2020

वंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत!

महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर नेण्याचे पातक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरूषांच्या प्रतिमांची तुलना आणि विडंबन सोबत जात, समाज अशा विषयांवर उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहेत. संपूर्ण भारतभूमीचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतर नेत्यांशी तुलना करण्याच्या अपराधात छत्रपतींच्या सातार गादीच्या वंशाकडे पुरावे मागण्याचा प्रमाद संजय राऊत या पत्रकाराकडून घडला आहे. अर्थात, राऊत विरोधात अश्लाघ्य भाषेतील टीका टीपणी समाज माध्यमात सुरु झाली आहे. हा प्रसंग लक्षात घेता इतिहासातील दुसऱ्या  प्रसंगाची प्रकर्षाने आठवण होते. तो प्रसंग म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या कुळाला  शुद्र ठरवून मंगल विधी करण्यास ब्रह्मवृंदाने नकार दिला होता. तेव्हा खुद्द महाराजांनाही आपल्या क्षत्रिय कुळाची वंशावळ शोधावी लागली होती.

Saturday, 4 January 2020

जळगाव मनपात कोण आहेत हे निर्लज्ज ?

जळगाव महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कारभारी आमदार मामा आणि महापौर मामी आहेत. यांचे नेते माजी पालकमंत्री गिरीशभू आहेत. बाकी उरलेले भाजपचे नगरसेवक म्हणजे किस गली मे खसखस आहेत. जमेल तेथे शहराचे वाट्टोळे करणे आणि सरकारी निधीतून पैसा खाणे असा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. पैसा खाण्यात संघ परिवाराशी संबंधित चेहरे आणि त्यांचे नातेवाईकही आघाडीवर आहेत.

Thursday, 2 January 2020

बस्स झाले लवंगी फटाके ...

नाथाभाऊ यांना पत्रकार मित्राने लिहिलेले खुले पत्र 

आ. नाथाभाऊ गेल्या दोन दिवसात तुम्ही केलेल्या आरोपाच्या बातम्या सोशल मीडियातून वेगात व्हायरल झाल्या. तुम्ही म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमची उमेदवारी कापली. गेल्या ३ वर्षांत हा विषय वारंवार चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या बातमीला नाथाभाऊंचा गौप्यस्फोट किंवा नाथाभाऊंचा बाॅम्बगोळा असा शब्दही आता वापरला जात नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचे गांभीर्य नंतर तुमच्याच कृतीने संपवून टाकले. भाजपच्या एका बैठकीत तुम्ही आणि गिरीश महाजन एकत्र आले. या बैठकीत तुम्ही दोघे जवळ बसले. शिवाय, हास्य विनोदात एकमेकांच्या टाळ्याही घेतल्या. तुमच्या या कृतीला माध्यमांनी लगेच मनोमिलन म्हणून टाकले. नाथाभाऊ तुम्ही असे करुन काय मिळवित आहात ? आता तुमचे बोलणे हे गौप्यस्फोट किंवा बाॅम्बगोळेही राहिले नाहीत. ते फुसके लवंगी फटाके ठरताहेत. वाटू दे तुम्हाला व तुमच्या काही समर्थकांना वाईट, पण जे खरे ते लिहायला हवे.

Saturday, 14 December 2019

आरोपांच्या पिंजऱ्यात खडसेच कशासाठी ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपत आरोप प्रत्यारोपांची सुदोपसुंदी सुरु आहे. एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे पालवे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट करुन व्यक्तिगत असंतोष प्रकट केला आहे. याच अनुषंगाने खडसे व मुंडे पालवे यांच्या विषयी सलग तीन लेख लिहिले. अडचणीत वापरले जाणारे बहुजन कार्ड, पराभवाच्या मागील वास्तव कारणे आणि गेल्या चार वर्षांत पक्ष व नेत्यांविषयी केलेली कृती याविषयी लेखांमध्ये परखड भाष्य होते. खडसे यांच्या समर्थक, हितचिंतक आणि व्यक्तीनिष्ठावंतांनी त्यावर फारशा प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र, 'पित्याचे आहेर आणि कन्येला माहेर' या लेखानंतर खडसे यांच्या दोन-तीन समर्थकांनी संपर्क करुन काही मुद्दे मांडले. माझ्या लेखांमधील एक बाजू बरोबर असली तरी त्याची दुसरी बाजू सुध्दा समोर यायला हवी असा आग्रह त्यांनी केला. राजकारणाचे निरीक्षण करताना व त्यामागील कारणांची मिमांसा करताना तटस्थता व निरपेक्षता जपायला हवी म्हणून खडसेंची दुसरी बाजू मांडणेही गरजेचे आहे हे मलाही जाणवले. अर्थात, या दुसऱ्या बाजूशी मी सहमत आहे असे मुळीच नाही.

Friday, 13 December 2019

पित्याचे 'आहेर' आणि कन्येला 'माहेर'

महायुती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार सुरु केले. भाजप सत्तेपासून लांब गेली. भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घ्यायची संधी काहींना मिळाली आहे. या मंडळींमध्ये एकनाथराव खडसे हे सध्या आक्रमक आहेत. फडणवीस यांना घालून पाडून बोलायची एकही संधी खडसे सध्या सोडत नसल्याचे दिसते आहे. अर्थात, गेल्या साडेतीन-चार वर्षांत खडसेंचा अजेंडा हाच होता. सार्वजनिक ठिकाणी जेव्हाही बोलाल तेव्हा फडणवीसांवर टीका करा आणि भाजप नेतृत्वातील युती सरकारला घरचे आहेर द्या ! खडसेंनी सन २०१७ पासून केलेली जाहीर वक्तव्ये आज क्रमाने वाचली तर लक्षात येते की, भाजपत राहून खडसे विरोधी पक्षाचे काम करीत होते. फडणवीस यांचे वस्त्रहरण करीत होते. खडसेंनी फडणवीस सरकारवर जेवढे आरोप केले तेवढे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केले नाहीत.

Tuesday, 10 December 2019

अल्पसंख्यांक उमेदवारांचा पराभव कोणी घडवला ?

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचे निमित्त पुढे करुन बंडाळीची स्थिती निर्माण केली आहे. कन्येचा पराभव पक्षांतर्गत मंडळींनीच घडवला असा दावा करीत थेट दिल्लीत पक्षाध्यक्ष, प्रभारी यांच्या भेटीचा प्रयत्न केला. संबंधित पदाधिकारी व इतर नेते कामात व्यस्त असल्यामुळे खडसेंना कोणीही भेटले नाही. अखेर ज्येष्ठनेते शरद पवार यांना खडसे भेटले. तेथून मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे भेटले. खडसे-पवार आणि खडसे-ठाकरे भेटीनंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार किंवा शिवसेनेत जाणार अशा बातम्या अवतरल्या आहेत. शिवाय, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याचे 'आवतण' दिले आहे. खडसेंच्या भोवती पक्षांतराचा चक्रव्युह त्यांनी स्वतःच अशा प्रकारे रचला आहे.

Saturday, 7 December 2019

हरिभाऊ जावळेंच्या पराभवावर चर्चा का नाही ?

जळगाव जिल्हा भाजपमध्ये सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा मुद्दा चर्चेत आणून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. 'खडसेंनी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची थेट नावे जाहीर करावीत', असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर उत्तराची अपेक्षा खडसेंकडून आहे. मात्र यावर खडसे म्हणाले, 'मी पक्ष शिस्त पाळतो. पक्षांतर्गत विषय माध्यमात कसा सांगू ? त्यासाठी मला प्रदेशाध्यक्षांची परवानगी हवी.' खडसे पुढे असेही म्हणाले, 'आता पुरावे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार !' म्हणजेच तूर्त खडसेंकडून पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची नावे बाहेर येण्याची शक्यता नाही. परंतु पक्षशिस्त पाळणाऱ्या खडसेंनी गेल्या ५ वर्षांत थेट माध्यमांच्यासमोर पक्षनेतृत्वाला व पक्षाला कित्तेकदा टीकेचा आहेर दिला आहे, हे सुध्दा यावेळी आठवते.

रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाची चर्चा ठरवून घडवून आणली जात असताना 'हरिभाऊ जावळे यांचा पराभव कोणी घडवून आणला ?' या विषयी कसे कोणी बोलत नाही, असेही मेसेज कालपासून मला येत आहेत. हरिभाऊ हे सुध्दा लेवा पाटीदार समाजाचे आहेत. खडसे यांनी बहुजन नेते याची जी व्याख्या स्वतःसाठी केली तीच व्याख्या हरिभाऊ जावळे यांना लागू होते. रोहिणी खडसे खेवलकर यांच्याप्रमाणे जावळे सुध्दा पराभूत झाले आहेत. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा अहवाल जसा पक्षांतर्गत विरोधकांकडे बोट दाखवतो तसा हरिभाऊंचाही मौखिक अहवाल कोणाचे नाव सांगतो ? या प्रश्नाचीही उघड चर्चा आता सुरु आहे.

हरिभाऊ जावळे यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली होती. ती ऐनवेळी रद्द करण्यापासून हरिभाऊंच्या बहुजन असण्यावर अन्याय सुरु झाला.  पक्षांतर्गत दादागिरी असणाऱ्या नेत्यांमुळे हरिभाऊची उमेदवारी व बहुजन असणे हरवून गेले.  सन २०१४ मध्ये हरिभाऊ जावळे आमदार झाले. भाजपत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अंतर्गत घडामोडी घडत असताना लेवा पाटीदार समाजाचा मंत्री असावा म्हणून हरिभाऊंचा एक-दोनवेळा विचार झाला. पण हरिभाऊंना ही संधी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले ? यावरही काही मंडळी चर्चा करतात.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालाचा कौल युतीच्या बाजूने जाणार हे विविध सर्वेक्षण व एक्झीट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आले होते. यात जशी मुक्ताईनगरची जागा विजयी म्हणून गृहीत होती तशीच रावेर-यावलची जागाही गृहीत होती. हा कौल पक्षांतर्गत मंत्रीपदाच्या लाभाला छेद देणारा होता. भाजपत ३ लेवा आमदार होणार असे गृहीत धरलेले होते. जळगावसह मुक्ताईनगर व रावेर-यावलच्या जागा त्यात होत्या. यातील जळगावच्या आमदाराचे मंत्रीपद कापणे सोपे होते. दारु व्यावसायिक हे बिरुद वापरुन कधीही पत्ता कट करता येत होता. पण  हरिभाऊ पुन्हा आमदार झाले आणि युतीचे सरकार आले तर दोनदा खासदार व तिसऱ्यांदा आमदार झालेल्या हरिभाऊंना किमान राज्यमंत्रीपद सहज मिळाले असते. अर्थात, अनुभवी, चाणाक्ष नेत्यांनी हरिभाऊंच्या मंत्रीपदाचा होरा बांधून यावल, रावेर, बामणोद, सावदा, फैजपूर भागात हरिभाऊ ऐवजी काँग्रेसच्या उमेदवाराला रसद पुरविली. कोण होते ते रसद पुरवणारे ?

हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, बामणोद येथे पक्षाची जाहीरसभा होती. किमान १० हजारांवर श्रोते होते. या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'तो काँग्रेसवाला उमेदवार पण चांगला आहे. पण तुम्ही हरिभाऊला मते द्या !' हरिभाऊच्या सभेत विरोधकाला चांगुलपणा बहाल करणे ही पक्ष विरोधी कार्यवाही होत नसावी ? हरिभाऊंचे समर्थक भुसावळच्या सभेचे सुद्धा उदाहरण देतात. भुसावळला झालेल्या सभेत बुजूर्ग नेते म्हणाले, 'तुमच्या मतदार संघाच्या बगलवाला माझ्याकडे आला नाही. त्याला मी चालत नाही. सावकारे चांगला आहे. त्याला निवडून द्या.' अर्थात, बगलवाला म्हणजे कोण ? हे शोधले तर भुसावळच्या बगलवाले जळगावकर आणि रावेर-यावलकर येतात. यात हरिभाऊ होतेच. हरिभाऊंचे समर्थक असेही म्हणतात की भुसावळमधील भाजपच्या नगरसेवकांनी उघडपणे मतदार संघात येऊन विरोधात काम केले. शिवाय, भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत हरिभाऊंचे नाव आले, त्यादिवशी हरिभाऊ मुक्ताईनगरात नेत्यांकडे बसून होते.

सन २०१९ च्या निवडणुकीत लेवा भोर पंचायतने घाऊक स्वरुपात पाठिंबा देणे, उमेदवारीसाठी इशारा देणे असे काम केले. लेवा भोर पंचायतने कोणासाठी, कसे मेळावे घेतले ? हे अनेकांनी यापूर्वी सांगितले आहे. लेवा भोर पंचायतने जळगावमध्ये सुरेश भोळे व मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे खेवलकर यांना पाठिंबा दिला. पण रावेर-यावलमध्ये हरिभाऊंना दिला नाही. कुटुंब नायकांचे पुत्र काँग्रेसच्या व्यासपिठावर बसून प्रचारात सक्रिय होते. त्यांचे बोलविते धनी कोण ? हे लेवा समाजाला माहिती आहे. हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, लेवा भोर पंचायतची फरपट पूर्वी कधीही स्व. वाय. एस. महाजन, स्व. मधुकरराव, स्व. जे. टी. महाजन वा स्व. गुणवंतराव सरोदे यांनी राजकीय स्वार्थासाठी केली नाही. आता तर समाज दावणीलाच बांधला आहे.

हरिभाऊंच्या समर्थकांना कळीचा प्रश्न विचारला. अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका हरिभाऊंना बसला नाही का ? यावर ते म्हणतात, 'चौधरी यांचा मतदार वर्ग निश्चित होता. असाही तो भाजपच्या विरोधात होता. चौधरी हे कधीही विजयाच्या जवळ नव्हते. काँग्रेस वा बहुजन वंचितसाठी ते पर्याय होते.' हरिभाऊंचे समर्थकही एक एक कडी जोडून पराभव कसा घडवून आणला याचे विवेचन करतात. मधुकर सहकारी कारखाना हरिभाऊंच्या ताब्यात होता. जिल्हा सहकारी बँक भाजप नेतृत्वाच्या ताब्यात होती. पण बँकेकडून कर्ज वाटपात विलंब केला गेला. शेतकऱ्यांची देणी थकली. हरिभाऊ विषयी रोष निर्माण होत गेला. अखेर कारखानाही हरिभाऊच्या हातून गेला.

भाजपत बहुजनांवर अन्याय अशी भूमिका घेत जेव्हा कोणीही (विशिष्ट व्यक्ती नाही) ढोंग करते तेव्हा हरिभाऊ जावळे हे बहुजन नसतात का ? असा प्रश्न समर्थक विचारतात. हरिभाऊ जावळे यांच्या पराभवाचा इतिहासही आता उगाळला जात आहे. पण हरिभाऊ भाजपत एवढे लहान बहुजन नेते आहेत की, ते प्रदेशाध्यक्षाला खरे सांगू शकत नाही व पक्षाध्यक्षाला अहवाल देणे तर दूरच ...

तो फोटो कशाचा पुरावा ?

हरिभाऊचे समर्थक म्हणतात, ज्यादिवशी भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी शिवसेना- भाजप युती होती. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील भाऊ व गिरीशभाऊ सोबत अर्ज भरायला आले. पहिल्या यादीत खडसेंचे नावा नव्हते म्हणून दुसऱ्यादिवशी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. नंतर त्यांनी जिल्हा प्रमुखपद सोडून बंडखौरी केली.'

Friday, 8 November 2019

देवा, थोबाड बंद ठेवा !

सन १९९२/९३ हे वर्ष जळगाव शहरात चर्चेत असलेल्या कथित लैंगिक छळ प्रकरणाचे होते. जळगाव नगर पालिकेतील राजकारणाने मतभेदांचे टोक गाठलेले होते. जळगाव पालिकेतील मनमानी कारभारांचे अनेक ठराव तेव्हाचे जिल्हाधिकारी अजय भुषण पांडे यांनी कलम ३०८ वापरुन व्यपगत केले होते. नगराध्यक्षपदी असलेले तेव्हाचे आमदार सुरेशदादा जैन विरोधात अविश्वासाची जमवाजमव डॉ. अर्जून भंगाळे यांनी केली होती. नगरसेवकांना सहलीला पाठवले होते. तेव्हा विधानसभाध्यक्ष असलेले मधुकरराव चौधरी आणि तेव्हा नगरविकास मंत्री असलेले अरुण गुजराथी जळगाव नगर पालिका बरखास्त करण्याच्या मूडमध्ये होते. स्व. बबन बाहेती, स्व, नरेंद्र पाटील व स्व. उल्हास साबळे नगर पालिकेतील मनमानी कारभाराची प्रकरणे उकरुन काढत होते. याच वादात फैशन कटपीस सेंटर ही टपरी हटविण्यावरुन जैन- बाहेती विवाद झाला. जिल्हाधिकारी पांडे विरोधात जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक स्व. दीपक जोग विरोधात जैन असा संघर्षही सुरु होता. जैन यांनी अटकेच्या निषेधार्थ ७ दिवस पोलीस ठाणे आवारातच उपोषण केले.

अधिकारी विरुध्द पदाधिकारी वादात मलिक आणि पाटील हे दोन जण पोलिसांच्या हाती संशयित म्हणून लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील एक कथित संशयित शहनावाज हा भुसावळला नईम यांच्याकडे आश्रित असल्याचे आढळले होते. या शहनवाजचे जळगावात काय संबंध असावेत ? या तपासात मलिक पकडला होता. त्याने शहाजोगपणे आरोप नाकारला पण हॉटेल तिरुपतीमध्ये होणाऱ्या लैंगिक प्रकरणांची माहिती तपास अधिकारी तेव्हाचे अप्पर अधीक्षक दिलीप श्रीराव व प्रशिक्षणार्थी बाळासाहेब शेखर यांना दिली. या माहितीतून पुढे जळगावमधील कथित लैंगिक छळ प्रकरणांची चर्चा सुरु झाली.

दिलीप श्रीराव व बाळासाहेब शेखर यांनी लैंगिक छळ प्रकरणात ५०० महिला असू शकतात असा दावा केला. संपूर्ण देशच या दाव्याच्या नंतर हादरला. जळगाव पालिका बरखास्त करायला स्व. चौधरी व गुजराथी यांना कारण मिळाले. त्याचवेळी स्व. जोग यांची बदली झाली. नंतर आले पी. डी. जाधव. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जाधव विश्वासू होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे धागेदोरे तपासून त्यात गुंतलेल्या मुली वा महिला फक्त २५ असाव्यात असा दावा केला. याला कारणही असेच होते. ज्या मुली व महिलांची नावे होती ती केवळ विशेष नामे होती. बापाचे नाव, आडनाव व पत्तेही नव्हते. स्व. जोग असताना आकडा ५०० चा आणि जाधव आल्यावर आकडा फक्त २५ यावर गदारोळ उठला. सरकार प्रकरण दडपते आहे असा आरोप सुरु झाला. या वातावरणात विशेष तपास अधिकारी म्हणून जळगावला आले तेव्हाचे उपमहासंचालक स्व अरविंद इनामदार. त्यांना मदत करायला होते स्व. जोग आणि आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर.

इनामदार हे सुध्दा पवार यांचे विश्वासू होते. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी रोजच्या पत्रकार परिषदा घेऊन जळगावमधील मुली-महिलांना संशयाच्या घेऱ्यात ओढले होते. हे प्रकरण लवकर निपटून गुन्हे दाखल करायची जबाबदारी इनामदार यांच्यावर होती. इनामदार, जोग व बोरवणकर पोलीस मुख्यालयातील आयपीमेसला मुक्कामी होते. तेथे इनामदार पहिल्यांदा पत्रकारांना भेटले. प्रसन्न मुद्रेतील इनामदारांनी सर्वांना 'काय देवा कसे आहात ?' असे वाचारले. त्यानंतर पत्रकार परिषद सुरु झाली. पुन्हा आकडे ५००/२५ भोवती फिरले. तेव्हा इनामदार म्हणाले, 'आज मुली व महिलांची संख्या मोजू नये. आपण तक्रारदार येतील तसे गुन्हे दाखल करु. गुन्हे दाखल होताना तपास योग्य प्रकारे करु. मी एसपी व इतरांना थोबाड बंद ठेवायला सांगितले आहे. थोबाड केल्यानेच ५ चे ५०० आणि ५०० चे २५ झाले. या पत्रकार परिषदेत मी बोललो नाही. कारण मी 'सकाळ' चा बातमीदार होतो आणि इनामदारांचा मला अगोदरच निरोप होता. तुमचा पेपर पवारसाहेबांचा आहे. आपण नंतर बोलू या !

पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी इनामदार यांनी मला बोलावले. स्व. जोग, श्रीराव व शेखर यांच्यापैकी कोणी ५०० चा आकडा सांगितला या विषयी विचारणा केली. त्यांना माझा जबाब हवा होता. कारण ५०० च्या आकड्यावरुन विभागांतर्गत चौकशी लागणार होती. अर्थात, मी ५०० च्या आकड्यात नव्हतो. सर्व दैनिकांनी ५०० हा आकडा छापला होता. पण 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा होता. तो का आला ? याची स्वतंत्र कथा आहे. इनामदारांनी मला जबाबाचे सांगितले. मी म्हटले, 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा आहे. मी कसे काय ५०० सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव घेऊ ? आम्ही आकडा ३०० का केला ? हे इनामदारांना सांगितले. जर ५०० आकडा छळ झालेल्या मुली वा महिलांचा असेल तर त्यांचा छळ करणारे संशयित किमान १००० पुरुष हवेत. तसे दिसत नाही. म्हणून आम्ही ३०० चा मध्य काढला. हे इनामदारांना सांगितले. त्यांनी तेथेच मला त्यांचा पेन भेट दिला. म्हणाले, 'तू पत्रकार असून तुला हे कळले. पण आमच्या अधिकाऱ्यांना हे लॉजिक कसे कळले नाही ?' अखेर माझा जबाब रद्द झाला.

लैंगिक छळ प्रकरणात तेव्हा काही नगरसेवक व इतर पुढारी संशयित होते. ज्यांना मास्टर माईंड म्हटले होते त्यांनी लैंगिक छळ हे मानसिक विकृतीतून केले का ? हा सुध्दा तपासाचा भाग होता. इनामदार मला म्हणाले, 'या दोघा आरोपींची मला मानसिक तपासणी करायची आहे. तुम्ही तशी बातमी तुमच्या दैनिकात देऊन आरोपींची मानसिक तपासणी करायचे सूचवा.' आता इनामदार म्हणताहेत म्हणून मी तशी बातमी केली. त्यात एका संघटनेचे नाव वापरले. मात्र त्या संघटनेला तसे सांगितले नाही. तेथे चूक झाली. दुसऱ्या दिवशी ती संघटना म्हणू लागली, 'दोघा संशयितांनी पूर्णतः शुध्दीवर व मानसिक परिपक्व अवस्थेत लैंगिक छळ केले आहेत. 'सकाळ' ने चुकीची बातमी दिली आहे.'  या संघटनेचे काही पदाधिकारी तेव्हाचे संपादक कांबळेंचे मित्र होते. विषय कांबळेंपर्यंत गेला. कांबळे जळगावला आले. कांबळे व इनामदार मित्र होते. इनामदारांनी जे घडले ते सांगून 'तिवारी यांनी मला तपासात मदत करायला बातमी दिली' हे स्वीकारले. कांबळेंचाही माझ्यावर विश्वास होता. अखेर प्रकरण थांबले.

इनामदार २८ दिवस जळगावला होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी केवळ २ तक्रारदार मुली-महिला टिकल्या. इतर पुन्हा आल्याच नाहीत. ५०० चा आकडा २५ वरुन केवळ २ वर आला. जळगाव लैंगिक छळ प्रकरणाला अवास्तव प्रसिध्दी देऊन माध्यमांनी जळगावातील महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एका कथित प्रकरणामुळे जळगाव बदनाम झाले.


ता.क. - लैंगिक छळ प्रकरणाचे वार्तांकन वास्तववादी केले म्हणून मला 'सकाळ' चा डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार मिळाला. याच प्रकरणासाठी स्व. चौधरी व अरुण गुजराथी यांच्या हस्ते माझा सत्कार होणार होता. तो मी नाकारला. कारण, जळगावची बदनामी करणाऱ्या प्रकरणासाठी सत्कार नको, ही माझी भूमिका होती.

Tuesday, 5 November 2019

बिभिषण, विदूर आणि संजय राऊत

राम-रावण युद्धाचे वर्णन करताना बिभिषण आणि पांडव-कौरव संघर्ष सांगताना विदूर ही पात्रे वगळी जात नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भाजप-शिवसेना युतीतील विवादाची प्रकरणे लिहिताना संजय राऊत हे पात्र वगळता येणार नाही. बिभिषण, विदूर आणि संजय राऊत या तीनही पात्रात एक सुक्ष्म समान धागा आहे. तो म्हणजे, हे तिघे ज्या पक्षात असल्यागत वाटत होते, त्यांनी प्रत्यक्षात विरोधी गटांशी फितुरी केली. अर्थात, फितूर होणे हा वाक्प्रचार समर्थकांना चीड आणणारा ठरु शकतो. ते टाळण्यासाठी असेही म्हणता येईल की, रावणाच्या पक्षात राहून बिभिषण याने रामाशी, कौरवांच्या बाजूने असूनही विदूरने पांडवांशी आणि महायुतीत असूनही संजय राऊत यांनी महाआघाडीतील घटक पक्षांशी संधान साधले. संधान साधणे म्हणजे निश्चित केलेले लक्ष्य साधणे. शत्रू पक्षासोबत गुप्तपणे बैठका घेऊन कोणाला तरी बेसावध ठेऊन नवी युती किंवा आघाडी करणे. असे करणे हा कपट नितीचा भाग मानला जातो. कधी कधी कपट हे सकारात्मक कार्यासाठी असते. बहुतेक वेळा ते स्वहित आणि इतरांच्या अहितासाठी असते. संजय राऊत यांनी साधलेले संधान शिवसेनेच्या हितासाठी व महायुतीच्या अहितासाठी आहे.