Saturday 7 December 2019

हरिभाऊ जावळेंच्या पराभवावर चर्चा का नाही ?

जळगाव जिल्हा भाजपमध्ये सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा मुद्दा चर्चेत आणून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. 'खडसेंनी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची थेट नावे जाहीर करावीत', असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर उत्तराची अपेक्षा खडसेंकडून आहे. मात्र यावर खडसे म्हणाले, 'मी पक्ष शिस्त पाळतो. पक्षांतर्गत विषय माध्यमात कसा सांगू ? त्यासाठी मला प्रदेशाध्यक्षांची परवानगी हवी.' खडसे पुढे असेही म्हणाले, 'आता पुरावे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार !' म्हणजेच तूर्त खडसेंकडून पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची नावे बाहेर येण्याची शक्यता नाही. परंतु पक्षशिस्त पाळणाऱ्या खडसेंनी गेल्या ५ वर्षांत थेट माध्यमांच्यासमोर पक्षनेतृत्वाला व पक्षाला कित्तेकदा टीकेचा आहेर दिला आहे, हे सुध्दा यावेळी आठवते.

रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाची चर्चा ठरवून घडवून आणली जात असताना 'हरिभाऊ जावळे यांचा पराभव कोणी घडवून आणला ?' या विषयी कसे कोणी बोलत नाही, असेही मेसेज कालपासून मला येत आहेत. हरिभाऊ हे सुध्दा लेवा पाटीदार समाजाचे आहेत. खडसे यांनी बहुजन नेते याची जी व्याख्या स्वतःसाठी केली तीच व्याख्या हरिभाऊ जावळे यांना लागू होते. रोहिणी खडसे खेवलकर यांच्याप्रमाणे जावळे सुध्दा पराभूत झाले आहेत. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा अहवाल जसा पक्षांतर्गत विरोधकांकडे बोट दाखवतो तसा हरिभाऊंचाही मौखिक अहवाल कोणाचे नाव सांगतो ? या प्रश्नाचीही उघड चर्चा आता सुरु आहे.

हरिभाऊ जावळे यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली होती. ती ऐनवेळी रद्द करण्यापासून हरिभाऊंच्या बहुजन असण्यावर अन्याय सुरु झाला.  पक्षांतर्गत दादागिरी असणाऱ्या नेत्यांमुळे हरिभाऊची उमेदवारी व बहुजन असणे हरवून गेले.  सन २०१४ मध्ये हरिभाऊ जावळे आमदार झाले. भाजपत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अंतर्गत घडामोडी घडत असताना लेवा पाटीदार समाजाचा मंत्री असावा म्हणून हरिभाऊंचा एक-दोनवेळा विचार झाला. पण हरिभाऊंना ही संधी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले ? यावरही काही मंडळी चर्चा करतात.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालाचा कौल युतीच्या बाजूने जाणार हे विविध सर्वेक्षण व एक्झीट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आले होते. यात जशी मुक्ताईनगरची जागा विजयी म्हणून गृहीत होती तशीच रावेर-यावलची जागाही गृहीत होती. हा कौल पक्षांतर्गत मंत्रीपदाच्या लाभाला छेद देणारा होता. भाजपत ३ लेवा आमदार होणार असे गृहीत धरलेले होते. जळगावसह मुक्ताईनगर व रावेर-यावलच्या जागा त्यात होत्या. यातील जळगावच्या आमदाराचे मंत्रीपद कापणे सोपे होते. दारु व्यावसायिक हे बिरुद वापरुन कधीही पत्ता कट करता येत होता. पण  हरिभाऊ पुन्हा आमदार झाले आणि युतीचे सरकार आले तर दोनदा खासदार व तिसऱ्यांदा आमदार झालेल्या हरिभाऊंना किमान राज्यमंत्रीपद सहज मिळाले असते. अर्थात, अनुभवी, चाणाक्ष नेत्यांनी हरिभाऊंच्या मंत्रीपदाचा होरा बांधून यावल, रावेर, बामणोद, सावदा, फैजपूर भागात हरिभाऊ ऐवजी काँग्रेसच्या उमेदवाराला रसद पुरविली. कोण होते ते रसद पुरवणारे ?

हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, बामणोद येथे पक्षाची जाहीरसभा होती. किमान १० हजारांवर श्रोते होते. या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'तो काँग्रेसवाला उमेदवार पण चांगला आहे. पण तुम्ही हरिभाऊला मते द्या !' हरिभाऊच्या सभेत विरोधकाला चांगुलपणा बहाल करणे ही पक्ष विरोधी कार्यवाही होत नसावी ? हरिभाऊंचे समर्थक भुसावळच्या सभेचे सुद्धा उदाहरण देतात. भुसावळला झालेल्या सभेत बुजूर्ग नेते म्हणाले, 'तुमच्या मतदार संघाच्या बगलवाला माझ्याकडे आला नाही. त्याला मी चालत नाही. सावकारे चांगला आहे. त्याला निवडून द्या.' अर्थात, बगलवाला म्हणजे कोण ? हे शोधले तर भुसावळच्या बगलवाले जळगावकर आणि रावेर-यावलकर येतात. यात हरिभाऊ होतेच. हरिभाऊंचे समर्थक असेही म्हणतात की भुसावळमधील भाजपच्या नगरसेवकांनी उघडपणे मतदार संघात येऊन विरोधात काम केले. शिवाय, भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत हरिभाऊंचे नाव आले, त्यादिवशी हरिभाऊ मुक्ताईनगरात नेत्यांकडे बसून होते.

सन २०१९ च्या निवडणुकीत लेवा भोर पंचायतने घाऊक स्वरुपात पाठिंबा देणे, उमेदवारीसाठी इशारा देणे असे काम केले. लेवा भोर पंचायतने कोणासाठी, कसे मेळावे घेतले ? हे अनेकांनी यापूर्वी सांगितले आहे. लेवा भोर पंचायतने जळगावमध्ये सुरेश भोळे व मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे खेवलकर यांना पाठिंबा दिला. पण रावेर-यावलमध्ये हरिभाऊंना दिला नाही. कुटुंब नायकांचे पुत्र काँग्रेसच्या व्यासपिठावर बसून प्रचारात सक्रिय होते. त्यांचे बोलविते धनी कोण ? हे लेवा समाजाला माहिती आहे. हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, लेवा भोर पंचायतची फरपट पूर्वी कधीही स्व. वाय. एस. महाजन, स्व. मधुकरराव, स्व. जे. टी. महाजन वा स्व. गुणवंतराव सरोदे यांनी राजकीय स्वार्थासाठी केली नाही. आता तर समाज दावणीलाच बांधला आहे.

हरिभाऊंच्या समर्थकांना कळीचा प्रश्न विचारला. अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका हरिभाऊंना बसला नाही का ? यावर ते म्हणतात, 'चौधरी यांचा मतदार वर्ग निश्चित होता. असाही तो भाजपच्या विरोधात होता. चौधरी हे कधीही विजयाच्या जवळ नव्हते. काँग्रेस वा बहुजन वंचितसाठी ते पर्याय होते.' हरिभाऊंचे समर्थकही एक एक कडी जोडून पराभव कसा घडवून आणला याचे विवेचन करतात. मधुकर सहकारी कारखाना हरिभाऊंच्या ताब्यात होता. जिल्हा सहकारी बँक भाजप नेतृत्वाच्या ताब्यात होती. पण बँकेकडून कर्ज वाटपात विलंब केला गेला. शेतकऱ्यांची देणी थकली. हरिभाऊ विषयी रोष निर्माण होत गेला. अखेर कारखानाही हरिभाऊच्या हातून गेला.

भाजपत बहुजनांवर अन्याय अशी भूमिका घेत जेव्हा कोणीही (विशिष्ट व्यक्ती नाही) ढोंग करते तेव्हा हरिभाऊ जावळे हे बहुजन नसतात का ? असा प्रश्न समर्थक विचारतात. हरिभाऊ जावळे यांच्या पराभवाचा इतिहासही आता उगाळला जात आहे. पण हरिभाऊ भाजपत एवढे लहान बहुजन नेते आहेत की, ते प्रदेशाध्यक्षाला खरे सांगू शकत नाही व पक्षाध्यक्षाला अहवाल देणे तर दूरच ...

तो फोटो कशाचा पुरावा ?

हरिभाऊचे समर्थक म्हणतात, ज्यादिवशी भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी शिवसेना- भाजप युती होती. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील भाऊ व गिरीशभाऊ सोबत अर्ज भरायला आले. पहिल्या यादीत खडसेंचे नावा नव्हते म्हणून दुसऱ्यादिवशी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. नंतर त्यांनी जिल्हा प्रमुखपद सोडून बंडखौरी केली.'

4 comments:

  1. भुसावळातील एखाद दुसर्या भाजप नगरसेवकने वैयक्तीक वादातून हरिभाऊ च्या विरोधात प्रचार केला ही असेल परंतू इतर सर्व भाजप नगरसेवकांच्या भावना ह्या हरिभाऊ यांच्यासोबत होत्या.वेळोवेळी हरिभाऊ शी नगरसेवक बोलत होते...भाजपा नगरसेवक हे सावकारे यांच्या प्रचारात मग्न होते..रोहिणी ताई आनी हरिभाऊ यांचा अनपेक्षीत झालेला पराभव हा भुसावळातील नगरसेवक आनी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला....भुसावळातील अनिल चौधरी उमेदवार असल्याने आनी चौधरी परिवाराशी आसलेले राजकिय वैर पाहाता येथील भाजपा कार्यकर्ते आनी नगरसेवक हे हरिभाऊ साठी प्रयत्नशील होते...हरिभाऊ च्या पराभवाची ही चौकशी झालीच पाहीजे हिच सर्वांची भावना आहे...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. हरिभाऊंचा विजय निश्चित वाटत होता. भाजपचे सरकार येणार अशीच हवा होती आणि त्यात हरिभाऊंना मंत्रिपद मिळण्याची संधी आहे याची कल्पना मतदारांनाही होती. असे असतानाही त्यांचा पराभव झाला हे अनाकलनीय होते. हरिभाऊंचा त्यांच्या मतदारसंघात उत्तम जनसंपर्क होता. जल संधारण, वृक्ष लागवड अशा पर्यावरण संवर्धनाच्या कामांची यशस्वी सुरुवात त्यांनी यावल, रावेर परिसरात केली आहे. एक चांगले कार्य करणारा नेता पराभूत झाला याची चुटपुट मनाला नक्कीच वाटते.

    ReplyDelete