Saturday, 14 December 2019

आरोपांच्या पिंजऱ्यात खडसेच कशासाठी ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपत आरोप प्रत्यारोपांची सुदोपसुंदी सुरु आहे. एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे पालवे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट करुन व्यक्तिगत असंतोष प्रकट केला आहे. याच अनुषंगाने खडसे व मुंडे पालवे यांच्या विषयी सलग तीन लेख लिहिले. अडचणीत वापरले जाणारे बहुजन कार्ड, पराभवाच्या मागील वास्तव कारणे आणि गेल्या चार वर्षांत पक्ष व नेत्यांविषयी केलेली कृती याविषयी लेखांमध्ये परखड भाष्य होते. खडसे यांच्या समर्थक, हितचिंतक आणि व्यक्तीनिष्ठावंतांनी त्यावर फारशा प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र, 'पित्याचे आहेर आणि कन्येला माहेर' या लेखानंतर खडसे यांच्या दोन-तीन समर्थकांनी संपर्क करुन काही मुद्दे मांडले. माझ्या लेखांमधील एक बाजू बरोबर असली तरी त्याची दुसरी बाजू सुध्दा समोर यायला हवी असा आग्रह त्यांनी केला. राजकारणाचे निरीक्षण करताना व त्यामागील कारणांची मिमांसा करताना तटस्थता व निरपेक्षता जपायला हवी म्हणून खडसेंची दुसरी बाजू मांडणेही गरजेचे आहे हे मलाही जाणवले. अर्थात, या दुसऱ्या बाजूशी मी सहमत आहे असे मुळीच नाही.

Friday, 13 December 2019

पित्याचे 'आहेर' आणि कन्येला 'माहेर'

महायुती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार सुरु केले. भाजप सत्तेपासून लांब गेली. भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घ्यायची संधी काहींना मिळाली आहे. या मंडळींमध्ये एकनाथराव खडसे हे सध्या आक्रमक आहेत. फडणवीस यांना घालून पाडून बोलायची एकही संधी खडसे सध्या सोडत नसल्याचे दिसते आहे. अर्थात, गेल्या साडेतीन-चार वर्षांत खडसेंचा अजेंडा हाच होता. सार्वजनिक ठिकाणी जेव्हाही बोलाल तेव्हा फडणवीसांवर टीका करा आणि भाजप नेतृत्वातील युती सरकारला घरचे आहेर द्या ! खडसेंनी सन २०१७ पासून केलेली जाहीर वक्तव्ये आज क्रमाने वाचली तर लक्षात येते की, भाजपत राहून खडसे विरोधी पक्षाचे काम करीत होते. फडणवीस यांचे वस्त्रहरण करीत होते. खडसेंनी फडणवीस सरकारवर जेवढे आरोप केले तेवढे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केले नाहीत.

Tuesday, 10 December 2019

अल्पसंख्यांक उमेदवारांचा पराभव कोणी घडवला ?

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचे निमित्त पुढे करुन बंडाळीची स्थिती निर्माण केली आहे. कन्येचा पराभव पक्षांतर्गत मंडळींनीच घडवला असा दावा करीत थेट दिल्लीत पक्षाध्यक्ष, प्रभारी यांच्या भेटीचा प्रयत्न केला. संबंधित पदाधिकारी व इतर नेते कामात व्यस्त असल्यामुळे खडसेंना कोणीही भेटले नाही. अखेर ज्येष्ठनेते शरद पवार यांना खडसे भेटले. तेथून मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे भेटले. खडसे-पवार आणि खडसे-ठाकरे भेटीनंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार किंवा शिवसेनेत जाणार अशा बातम्या अवतरल्या आहेत. शिवाय, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याचे 'आवतण' दिले आहे. खडसेंच्या भोवती पक्षांतराचा चक्रव्युह त्यांनी स्वतःच अशा प्रकारे रचला आहे.

Saturday, 7 December 2019

हरिभाऊ जावळेंच्या पराभवावर चर्चा का नाही ?

जळगाव जिल्हा भाजपमध्ये सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा मुद्दा चर्चेत आणून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. 'खडसेंनी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची थेट नावे जाहीर करावीत', असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर उत्तराची अपेक्षा खडसेंकडून आहे. मात्र यावर खडसे म्हणाले, 'मी पक्ष शिस्त पाळतो. पक्षांतर्गत विषय माध्यमात कसा सांगू ? त्यासाठी मला प्रदेशाध्यक्षांची परवानगी हवी.' खडसे पुढे असेही म्हणाले, 'आता पुरावे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार !' म्हणजेच तूर्त खडसेंकडून पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची नावे बाहेर येण्याची शक्यता नाही. परंतु पक्षशिस्त पाळणाऱ्या खडसेंनी गेल्या ५ वर्षांत थेट माध्यमांच्यासमोर पक्षनेतृत्वाला व पक्षाला कित्तेकदा टीकेचा आहेर दिला आहे, हे सुध्दा यावेळी आठवते.

रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाची चर्चा ठरवून घडवून आणली जात असताना 'हरिभाऊ जावळे यांचा पराभव कोणी घडवून आणला ?' या विषयी कसे कोणी बोलत नाही, असेही मेसेज कालपासून मला येत आहेत. हरिभाऊ हे सुध्दा लेवा पाटीदार समाजाचे आहेत. खडसे यांनी बहुजन नेते याची जी व्याख्या स्वतःसाठी केली तीच व्याख्या हरिभाऊ जावळे यांना लागू होते. रोहिणी खडसे खेवलकर यांच्याप्रमाणे जावळे सुध्दा पराभूत झाले आहेत. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पराभवाचा अहवाल जसा पक्षांतर्गत विरोधकांकडे बोट दाखवतो तसा हरिभाऊंचाही मौखिक अहवाल कोणाचे नाव सांगतो ? या प्रश्नाचीही उघड चर्चा आता सुरु आहे.

हरिभाऊ जावळे यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली होती. ती ऐनवेळी रद्द करण्यापासून हरिभाऊंच्या बहुजन असण्यावर अन्याय सुरु झाला.  पक्षांतर्गत दादागिरी असणाऱ्या नेत्यांमुळे हरिभाऊची उमेदवारी व बहुजन असणे हरवून गेले.  सन २०१४ मध्ये हरिभाऊ जावळे आमदार झाले. भाजपत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अंतर्गत घडामोडी घडत असताना लेवा पाटीदार समाजाचा मंत्री असावा म्हणून हरिभाऊंचा एक-दोनवेळा विचार झाला. पण हरिभाऊंना ही संधी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले ? यावरही काही मंडळी चर्चा करतात.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालाचा कौल युतीच्या बाजूने जाणार हे विविध सर्वेक्षण व एक्झीट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आले होते. यात जशी मुक्ताईनगरची जागा विजयी म्हणून गृहीत होती तशीच रावेर-यावलची जागाही गृहीत होती. हा कौल पक्षांतर्गत मंत्रीपदाच्या लाभाला छेद देणारा होता. भाजपत ३ लेवा आमदार होणार असे गृहीत धरलेले होते. जळगावसह मुक्ताईनगर व रावेर-यावलच्या जागा त्यात होत्या. यातील जळगावच्या आमदाराचे मंत्रीपद कापणे सोपे होते. दारु व्यावसायिक हे बिरुद वापरुन कधीही पत्ता कट करता येत होता. पण  हरिभाऊ पुन्हा आमदार झाले आणि युतीचे सरकार आले तर दोनदा खासदार व तिसऱ्यांदा आमदार झालेल्या हरिभाऊंना किमान राज्यमंत्रीपद सहज मिळाले असते. अर्थात, अनुभवी, चाणाक्ष नेत्यांनी हरिभाऊंच्या मंत्रीपदाचा होरा बांधून यावल, रावेर, बामणोद, सावदा, फैजपूर भागात हरिभाऊ ऐवजी काँग्रेसच्या उमेदवाराला रसद पुरविली. कोण होते ते रसद पुरवणारे ?

हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, बामणोद येथे पक्षाची जाहीरसभा होती. किमान १० हजारांवर श्रोते होते. या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'तो काँग्रेसवाला उमेदवार पण चांगला आहे. पण तुम्ही हरिभाऊला मते द्या !' हरिभाऊच्या सभेत विरोधकाला चांगुलपणा बहाल करणे ही पक्ष विरोधी कार्यवाही होत नसावी ? हरिभाऊंचे समर्थक भुसावळच्या सभेचे सुद्धा उदाहरण देतात. भुसावळला झालेल्या सभेत बुजूर्ग नेते म्हणाले, 'तुमच्या मतदार संघाच्या बगलवाला माझ्याकडे आला नाही. त्याला मी चालत नाही. सावकारे चांगला आहे. त्याला निवडून द्या.' अर्थात, बगलवाला म्हणजे कोण ? हे शोधले तर भुसावळच्या बगलवाले जळगावकर आणि रावेर-यावलकर येतात. यात हरिभाऊ होतेच. हरिभाऊंचे समर्थक असेही म्हणतात की भुसावळमधील भाजपच्या नगरसेवकांनी उघडपणे मतदार संघात येऊन विरोधात काम केले. शिवाय, भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत हरिभाऊंचे नाव आले, त्यादिवशी हरिभाऊ मुक्ताईनगरात नेत्यांकडे बसून होते.

सन २०१९ च्या निवडणुकीत लेवा भोर पंचायतने घाऊक स्वरुपात पाठिंबा देणे, उमेदवारीसाठी इशारा देणे असे काम केले. लेवा भोर पंचायतने कोणासाठी, कसे मेळावे घेतले ? हे अनेकांनी यापूर्वी सांगितले आहे. लेवा भोर पंचायतने जळगावमध्ये सुरेश भोळे व मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे खेवलकर यांना पाठिंबा दिला. पण रावेर-यावलमध्ये हरिभाऊंना दिला नाही. कुटुंब नायकांचे पुत्र काँग्रेसच्या व्यासपिठावर बसून प्रचारात सक्रिय होते. त्यांचे बोलविते धनी कोण ? हे लेवा समाजाला माहिती आहे. हरिभाऊंचे समर्थक म्हणतात, लेवा भोर पंचायतची फरपट पूर्वी कधीही स्व. वाय. एस. महाजन, स्व. मधुकरराव, स्व. जे. टी. महाजन वा स्व. गुणवंतराव सरोदे यांनी राजकीय स्वार्थासाठी केली नाही. आता तर समाज दावणीलाच बांधला आहे.

हरिभाऊंच्या समर्थकांना कळीचा प्रश्न विचारला. अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका हरिभाऊंना बसला नाही का ? यावर ते म्हणतात, 'चौधरी यांचा मतदार वर्ग निश्चित होता. असाही तो भाजपच्या विरोधात होता. चौधरी हे कधीही विजयाच्या जवळ नव्हते. काँग्रेस वा बहुजन वंचितसाठी ते पर्याय होते.' हरिभाऊंचे समर्थकही एक एक कडी जोडून पराभव कसा घडवून आणला याचे विवेचन करतात. मधुकर सहकारी कारखाना हरिभाऊंच्या ताब्यात होता. जिल्हा सहकारी बँक भाजप नेतृत्वाच्या ताब्यात होती. पण बँकेकडून कर्ज वाटपात विलंब केला गेला. शेतकऱ्यांची देणी थकली. हरिभाऊ विषयी रोष निर्माण होत गेला. अखेर कारखानाही हरिभाऊच्या हातून गेला.

भाजपत बहुजनांवर अन्याय अशी भूमिका घेत जेव्हा कोणीही (विशिष्ट व्यक्ती नाही) ढोंग करते तेव्हा हरिभाऊ जावळे हे बहुजन नसतात का ? असा प्रश्न समर्थक विचारतात. हरिभाऊ जावळे यांच्या पराभवाचा इतिहासही आता उगाळला जात आहे. पण हरिभाऊ भाजपत एवढे लहान बहुजन नेते आहेत की, ते प्रदेशाध्यक्षाला खरे सांगू शकत नाही व पक्षाध्यक्षाला अहवाल देणे तर दूरच ...

तो फोटो कशाचा पुरावा ?

हरिभाऊचे समर्थक म्हणतात, ज्यादिवशी भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी शिवसेना- भाजप युती होती. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील भाऊ व गिरीशभाऊ सोबत अर्ज भरायला आले. पहिल्या यादीत खडसेंचे नावा नव्हते म्हणून दुसऱ्यादिवशी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. नंतर त्यांनी जिल्हा प्रमुखपद सोडून बंडखौरी केली.'

Friday, 8 November 2019

देवा, थोबाड बंद ठेवा !

सन १९९२/९३ हे वर्ष जळगाव शहरात चर्चेत असलेल्या कथित लैंगिक छळ प्रकरणाचे होते. जळगाव नगर पालिकेतील राजकारणाने मतभेदांचे टोक गाठलेले होते. जळगाव पालिकेतील मनमानी कारभारांचे अनेक ठराव तेव्हाचे जिल्हाधिकारी अजय भुषण पांडे यांनी कलम ३०८ वापरुन व्यपगत केले होते. नगराध्यक्षपदी असलेले तेव्हाचे आमदार सुरेशदादा जैन विरोधात अविश्वासाची जमवाजमव डॉ. अर्जून भंगाळे यांनी केली होती. नगरसेवकांना सहलीला पाठवले होते. तेव्हा विधानसभाध्यक्ष असलेले मधुकरराव चौधरी आणि तेव्हा नगरविकास मंत्री असलेले अरुण गुजराथी जळगाव नगर पालिका बरखास्त करण्याच्या मूडमध्ये होते. स्व. बबन बाहेती, स्व, नरेंद्र पाटील व स्व. उल्हास साबळे नगर पालिकेतील मनमानी कारभाराची प्रकरणे उकरुन काढत होते. याच वादात फैशन कटपीस सेंटर ही टपरी हटविण्यावरुन जैन- बाहेती विवाद झाला. जिल्हाधिकारी पांडे विरोधात जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक स्व. दीपक जोग विरोधात जैन असा संघर्षही सुरु होता. जैन यांनी अटकेच्या निषेधार्थ ७ दिवस पोलीस ठाणे आवारातच उपोषण केले.

अधिकारी विरुध्द पदाधिकारी वादात मलिक आणि पाटील हे दोन जण पोलिसांच्या हाती संशयित म्हणून लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील एक कथित संशयित शहनावाज हा भुसावळला नईम यांच्याकडे आश्रित असल्याचे आढळले होते. या शहनवाजचे जळगावात काय संबंध असावेत ? या तपासात मलिक पकडला होता. त्याने शहाजोगपणे आरोप नाकारला पण हॉटेल तिरुपतीमध्ये होणाऱ्या लैंगिक प्रकरणांची माहिती तपास अधिकारी तेव्हाचे अप्पर अधीक्षक दिलीप श्रीराव व प्रशिक्षणार्थी बाळासाहेब शेखर यांना दिली. या माहितीतून पुढे जळगावमधील कथित लैंगिक छळ प्रकरणांची चर्चा सुरु झाली.

दिलीप श्रीराव व बाळासाहेब शेखर यांनी लैंगिक छळ प्रकरणात ५०० महिला असू शकतात असा दावा केला. संपूर्ण देशच या दाव्याच्या नंतर हादरला. जळगाव पालिका बरखास्त करायला स्व. चौधरी व गुजराथी यांना कारण मिळाले. त्याचवेळी स्व. जोग यांची बदली झाली. नंतर आले पी. डी. जाधव. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जाधव विश्वासू होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे धागेदोरे तपासून त्यात गुंतलेल्या मुली वा महिला फक्त २५ असाव्यात असा दावा केला. याला कारणही असेच होते. ज्या मुली व महिलांची नावे होती ती केवळ विशेष नामे होती. बापाचे नाव, आडनाव व पत्तेही नव्हते. स्व. जोग असताना आकडा ५०० चा आणि जाधव आल्यावर आकडा फक्त २५ यावर गदारोळ उठला. सरकार प्रकरण दडपते आहे असा आरोप सुरु झाला. या वातावरणात विशेष तपास अधिकारी म्हणून जळगावला आले तेव्हाचे उपमहासंचालक स्व अरविंद इनामदार. त्यांना मदत करायला होते स्व. जोग आणि आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर.

इनामदार हे सुध्दा पवार यांचे विश्वासू होते. जळगाव लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी रोजच्या पत्रकार परिषदा घेऊन जळगावमधील मुली-महिलांना संशयाच्या घेऱ्यात ओढले होते. हे प्रकरण लवकर निपटून गुन्हे दाखल करायची जबाबदारी इनामदार यांच्यावर होती. इनामदार, जोग व बोरवणकर पोलीस मुख्यालयातील आयपीमेसला मुक्कामी होते. तेथे इनामदार पहिल्यांदा पत्रकारांना भेटले. प्रसन्न मुद्रेतील इनामदारांनी सर्वांना 'काय देवा कसे आहात ?' असे वाचारले. त्यानंतर पत्रकार परिषद सुरु झाली. पुन्हा आकडे ५००/२५ भोवती फिरले. तेव्हा इनामदार म्हणाले, 'आज मुली व महिलांची संख्या मोजू नये. आपण तक्रारदार येतील तसे गुन्हे दाखल करु. गुन्हे दाखल होताना तपास योग्य प्रकारे करु. मी एसपी व इतरांना थोबाड बंद ठेवायला सांगितले आहे. थोबाड केल्यानेच ५ चे ५०० आणि ५०० चे २५ झाले. या पत्रकार परिषदेत मी बोललो नाही. कारण मी 'सकाळ' चा बातमीदार होतो आणि इनामदारांचा मला अगोदरच निरोप होता. तुमचा पेपर पवारसाहेबांचा आहे. आपण नंतर बोलू या !

पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी इनामदार यांनी मला बोलावले. स्व. जोग, श्रीराव व शेखर यांच्यापैकी कोणी ५०० चा आकडा सांगितला या विषयी विचारणा केली. त्यांना माझा जबाब हवा होता. कारण ५०० च्या आकड्यावरुन विभागांतर्गत चौकशी लागणार होती. अर्थात, मी ५०० च्या आकड्यात नव्हतो. सर्व दैनिकांनी ५०० हा आकडा छापला होता. पण 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा होता. तो का आला ? याची स्वतंत्र कथा आहे. इनामदारांनी मला जबाबाचे सांगितले. मी म्हटले, 'सकाळ' मध्ये आकडा ३०० चा आहे. मी कसे काय ५०० सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव घेऊ ? आम्ही आकडा ३०० का केला ? हे इनामदारांना सांगितले. जर ५०० आकडा छळ झालेल्या मुली वा महिलांचा असेल तर त्यांचा छळ करणारे संशयित किमान १००० पुरुष हवेत. तसे दिसत नाही. म्हणून आम्ही ३०० चा मध्य काढला. हे इनामदारांना सांगितले. त्यांनी तेथेच मला त्यांचा पेन भेट दिला. म्हणाले, 'तू पत्रकार असून तुला हे कळले. पण आमच्या अधिकाऱ्यांना हे लॉजिक कसे कळले नाही ?' अखेर माझा जबाब रद्द झाला.

लैंगिक छळ प्रकरणात तेव्हा काही नगरसेवक व इतर पुढारी संशयित होते. ज्यांना मास्टर माईंड म्हटले होते त्यांनी लैंगिक छळ हे मानसिक विकृतीतून केले का ? हा सुध्दा तपासाचा भाग होता. इनामदार मला म्हणाले, 'या दोघा आरोपींची मला मानसिक तपासणी करायची आहे. तुम्ही तशी बातमी तुमच्या दैनिकात देऊन आरोपींची मानसिक तपासणी करायचे सूचवा.' आता इनामदार म्हणताहेत म्हणून मी तशी बातमी केली. त्यात एका संघटनेचे नाव वापरले. मात्र त्या संघटनेला तसे सांगितले नाही. तेथे चूक झाली. दुसऱ्या दिवशी ती संघटना म्हणू लागली, 'दोघा संशयितांनी पूर्णतः शुध्दीवर व मानसिक परिपक्व अवस्थेत लैंगिक छळ केले आहेत. 'सकाळ' ने चुकीची बातमी दिली आहे.'  या संघटनेचे काही पदाधिकारी तेव्हाचे संपादक कांबळेंचे मित्र होते. विषय कांबळेंपर्यंत गेला. कांबळे जळगावला आले. कांबळे व इनामदार मित्र होते. इनामदारांनी जे घडले ते सांगून 'तिवारी यांनी मला तपासात मदत करायला बातमी दिली' हे स्वीकारले. कांबळेंचाही माझ्यावर विश्वास होता. अखेर प्रकरण थांबले.

इनामदार २८ दिवस जळगावला होते. त्यांनी लैंगिक छळ प्रकरणाचे ९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी केवळ २ तक्रारदार मुली-महिला टिकल्या. इतर पुन्हा आल्याच नाहीत. ५०० चा आकडा २५ वरुन केवळ २ वर आला. जळगाव लैंगिक छळ प्रकरणाला अवास्तव प्रसिध्दी देऊन माध्यमांनी जळगावातील महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. एका कथित प्रकरणामुळे जळगाव बदनाम झाले.


ता.क. - लैंगिक छळ प्रकरणाचे वार्तांकन वास्तववादी केले म्हणून मला 'सकाळ' चा डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार मिळाला. याच प्रकरणासाठी स्व. चौधरी व अरुण गुजराथी यांच्या हस्ते माझा सत्कार होणार होता. तो मी नाकारला. कारण, जळगावची बदनामी करणाऱ्या प्रकरणासाठी सत्कार नको, ही माझी भूमिका होती.

Tuesday, 5 November 2019

बिभिषण, विदूर आणि संजय राऊत

राम-रावण युद्धाचे वर्णन करताना बिभिषण आणि पांडव-कौरव संघर्ष सांगताना विदूर ही पात्रे वगळी जात नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भाजप-शिवसेना युतीतील विवादाची प्रकरणे लिहिताना संजय राऊत हे पात्र वगळता येणार नाही. बिभिषण, विदूर आणि संजय राऊत या तीनही पात्रात एक सुक्ष्म समान धागा आहे. तो म्हणजे, हे तिघे ज्या पक्षात असल्यागत वाटत होते, त्यांनी प्रत्यक्षात विरोधी गटांशी फितुरी केली. अर्थात, फितूर होणे हा वाक्प्रचार समर्थकांना चीड आणणारा ठरु शकतो. ते टाळण्यासाठी असेही म्हणता येईल की, रावणाच्या पक्षात राहून बिभिषण याने रामाशी, कौरवांच्या बाजूने असूनही विदूरने पांडवांशी आणि महायुतीत असूनही संजय राऊत यांनी महाआघाडीतील घटक पक्षांशी संधान साधले. संधान साधणे म्हणजे निश्चित केलेले लक्ष्य साधणे. शत्रू पक्षासोबत गुप्तपणे बैठका घेऊन कोणाला तरी बेसावध ठेऊन नवी युती किंवा आघाडी करणे. असे करणे हा कपट नितीचा भाग मानला जातो. कधी कधी कपट हे सकारात्मक कार्यासाठी असते. बहुतेक वेळा ते स्वहित आणि इतरांच्या अहितासाठी असते. संजय राऊत यांनी साधलेले संधान शिवसेनेच्या हितासाठी व महायुतीच्या अहितासाठी आहे.

Wednesday, 16 October 2019

माझ्यावरील सर्व आरोप एकतर्फी - सुरेश भोळे

विधानसभेच्या जळगाव मतदार संघाची सन २०१४ मधील निवडणूक सर्व समाज घटकांच्या पाठबळावर मी जिंकली होती. आता सन २०१९ ची निवडूक सर्वच समाजांच्या भरघोस पाठबळावर जिंकणार. मी केवळ एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडून येत नाही. विविध समाज घटकातील मित्र, हितचिंतक आणि कार्यकर्ते यांच्या बळावर मी जिंकतो,” शी प्रतिक्रिया जळगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार व निवडणूक रिंगणातील भाजपचे उमेदवार सुरेश दामू भोळे तथा राजूमामा यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आमदार भोळे यांच्या आमदारकीच्या ५ वर्षांच्या आणि त्यांच्या पत्नी तथा महापौर सौ. सीमा भोळे यांच्या १ वर्षांच्या कार्यकाळावर सातत्याने टीका केली आहे. भोळे यांना सोशल मीडियातून ७ प्रश्नही विचारले होते. आरोप आणि त्या प्रश्नांबाबत आमदार भोळे यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून भोळे यांनी सविस्तर उत्तरे दिली.

Tuesday, 15 October 2019

पांढरा कांदा उत्पादकांचा कुंभमेळा ..

पांढरा कांदा उत्पादकांची गर्दी
जळगावस्थित जैन उद्योग समुहातील भाजीपाला निर्जलीकरण आणि मसाला निर्मिती करणाऱ्या ‘जैन फार्म फ्रेश’ या कंपनीतर्फे देशभरातील १४ शेतकऱ्यांना ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ प्रदान सोहळा ४ हजारावर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त गर्दीत सोमवारी (दि. १४) झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, पिंपळगाव हा परिसर ओळखला जातो. परंतु, गेल्या २० वर्षांत खानदेशच्या तीन जिल्ह्यांसह गुजरात व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पांढरा कांदा उत्पादकांची चळवळ ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने उभी केली आहे.

Monday, 14 October 2019

मनपा संकुलातील व्यापाऱ्यांचा “बैल आणि झोप”

विधानसभा निवडणूक प्रचाराची जळगाव शहर मतदार संघात धामधूम सुरु आहे. त्याचवेळी जळगाव मनपा मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील जवळपास २,३८७ व्यापाऱ्यांवर गाळ्यांना सील लावण्याच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दिवाळी तोंडावर असताना मनपा प्रशासन कारवाईचा फार्स रंगवित आहे. ज्या माजी व आजी सत्ताधाऱ्यांनी व्यापारी वर्गाला कधीही पूर्ण होणार नाहीत अशी आश्वासने देऊन झुलवले ते आता निवडणूक प्रचारात दंग असून मनपा अधिकारी व व्यापारी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारुन एकमेकाला शिवीगाळ करीत आहेत. पुढाऱ्यांची ही भूमिका गाव जळे आणि हनुमान बोंबी चोळे अशी आहे. अर्थात, यात दोष पूर्णतः व्यापारी वर्गाचा आहे. त्यांच्यातील दुही, राजकारणी लोकांचे पंटर यांनी वेळोवेळी केलेल्या दिशाभूल वर्तनाचा आहे.

Sunday, 13 October 2019

भाजपच्या फितूरांना फूस आणि रसद कोणाची ?


भाजपचे स्टार प्रचारक तथा भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे रविवारी झालेल्या सभास्थळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जळगाव जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात 'खडाखडी' झाली असे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ११ पैकी ७ मतदार संघात युती अंतर्गत भाजपचे आणि ४ मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या चौघांसमोर भाजपचे ४ 'फितूर' उमेदवारांनी प्रचारात आगळीक सुरु केली आहे. भाजपचे भगवे पट्टे गळ्यात घालून व मंत्री महाजन यांचा आशीर्वाद असल्याचे सांगत हे चौघे फितूर प्रचार करीत आहेत. त्यांच्यापैकी एक फितूर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर जळगाव ग्रामीण मतदार संघात आहे. हाच मुद्दा घेऊन गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभास्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे सभेपूर्वी वातावरण थोडे तापले. अर्थात, सभा संयोजक मंत्री महाजन यांनी गुलाबराव पाटील यांना टोलवून लावले.

Monday, 7 October 2019

राष्ट्रवादी'चा मुक्ताईनगरात 'बाय'...

विधानसभेच्या मुक्ताईनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांची माघार हा विषय धक्कादायक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने ॲड. रोहिणी खडसेंना दिलेला हा 'बाय' (म्हणजे आम्ही नाही लढत, तुम्ही जा पुढे) आहे. ॲड. पाटील यांनी निवडणूक लढण्याला केलेला हा 'बाय बाय' त्यांचे पिताश्री स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांच्या कार्यकाळातील काही संदर्भांची आठवण करुन देतो. महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे सलग २ टर्म अध्यक्षपद सांभाळण्याची संधी स्व. प्रल्हादभाऊ यांना मिळाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही किमया साधली गेली. शिखर बँकेच्या मुख्यालयात अध्यक्षाच्या कॅबिनसमोर तेव्हाचे सहकार मंत्री स्व. शंकरराव कोल्हे भेटीची प्रतिक्षा करीत बसलेले असत असे चित्र तेव्हा अनेकांनी पाहिले आहे. स्व. प्रल्हादभाऊ जळगाव जिल्हा बँकेचे व सहकार क्षेत्रातील अनभिषीक्त नेते होते. ते असे पर्यंत एकनाथराव खडसे जिल्हा बँकेत संचालक होऊ शकले नाहीत. दुसरीकडे खडसे यांनीही स्व. प्रल्हादभाऊ यांना विधी मंडळात किंवा संसदेत निवडून जाऊ दिले नाही. स्व. प्रल्हादभाऊंचे हे स्वप्न त्यांचे ॲड. रवींद्र पाटील हे साध्य करु शकले नाहीत.

Thursday, 3 October 2019

नाथाभाऊ - 'शल्य' ते 'शल्यचिकित्सा'

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शक्यतो असणार नाहीत. बहुधा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी आमदारकीचा वारसा नक्कीच चालवणार. आज सायंकाळपर्यंत या विषयावर पडदा पडलेला असेल.

Thursday, 26 September 2019

एमएससी बँक घोटाळ्यातील संगनमत ...


मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर राज्य सहकारी शिखर बँकेत (एमएससी बँक) सन २००५ ते २०१० दरम्यान झालेल्या कर्ज वाटप घोळाची तक्रार दाखल आहे. हा घोळ सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा दावा तक्रारीत आहे. तब्बल ४ वर्षे सुनावणी सुरु असलेल्या या तक्रारीत आढळलेल्या तथ्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला संशयित आरोपांच्या विरोधात ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात मूळ तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कलम ४२० (फसवणूक – दखलपात्र, अजामीनपात्र), ५०६ (अन्यायाने धमकावणे – अदखलपात्र, जामीनपात्र), ४०९ (सरकारी नोकर आदींनी विश्वासघात करणे), ४६५ (बनावट कागदपत्रे तयार करणे) आणि कलम ४६७ (किमतीचा दस्तऐवज / मृत्युलेख बनावट तयार करणे) नुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा (एफआयआर) नोंद झाला आहे.

Saturday, 14 September 2019

'एमआरपी' चा घोळ आणि झोल

स्पार्क बूट एमआरपी ९९९ रुपये
बाजारात मंदीची बोंबाबोंब सतत सुरु आहे. याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा ओरडा विशिष्ट घटक करतो आहे. कैबिनमध्ये खूर्ची उबवणारे माध्यम संपादक सुध्दा इंग्रजी लेखांवर आधारित अग्रलेख पाडत आहेत. मंदीमागे नेमकी कारणे काय ? हे शोधणारी वृत्तमालिका कुठेही दिसत नाही. व्यक्तिशः अनुभवातून बाजारपेठेत वस्तुंच्या एमआरपी (विक्रीची जास्तीत जास्त किंमत) चा घोळ व झोलचे एक खुपच लहान कारण मला समजले आहे. ते टप्प्याटप्प्याने स्पष्ट करतो. या शिवाय, मंदीची इतरही कारणे असू शकतील.

Sunday, 1 September 2019

अश्वत्थामा नाथाभाऊ, आपण जिंकणार !

संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेच्या मुल्यांकनात इतरांपेक्षा कितीतरी पुढे असलेले नेते एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांचा आज वाढदिवस. नाथाभाऊंना दीर्घायुष्यासह मनोवांच्छित यश प्राप्त व्हावे ही मनःपूर्वक शुभेच्छा.

Saturday, 31 August 2019

अब तेरा क्या होगा कालिया ?

जळगाव महानगर पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल अर्धा अपेक्षेनुसार आणि अर्धा धक्कादायक लागला. खटल्यातील ४८ संशयितांना शिक्षा सुनावली जाईल हे माझ्या अनुभवाधारे नक्की होते. मात्र आरोप सिद्धचा ठपका ठेऊन संगनमतात सहभागी प्रत्येकाडून सक्तीचा जबरी दंड सुध्दा वसूल केला जाईल हे ध्यानीमनी नव्हते.

Thursday, 29 August 2019

मराठा मंडळ* आणि राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पक्षावर आणि विरोधकांवर टीका करताना इतिहासातील मोजक्या संदर्भांचा खोचकपणे उल्लेख करतात. उदाहरण द्यायचे तर मनोहर जोशी हे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचा उल्लेख पवार यांनी श्रीमंत मनोहरपंत असा केला होता. जोशींना श्रीमंत पंत म्हणताना पवार यांना पेशव्यांना संबोधून होणारे श्रीमंत व छत्रपतींचे कारभारी पंत प्रतिनिधी या पदाची आठवण करुन द्यायची होती. जोशी हे शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. एक प्रकारे ते बाळासाहेबांचे प्रतिनिधी होते. शिवाय, ब्राह्मण असल्याने त्यांच्या रुपात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची पेशवाई अवतरली असे दर्शवायचा पवार यांचा हेतू होता.

Saturday, 24 August 2019

ग्राहकाचा मूड बदलला आहे

मंदीच्या चक्रव्युहात जागतिक अर्थ व्यवस्था सापडली आहे. जगभरातील सर्वच माध्यमातून याच विषयावर चर्चा सुरु आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या वेब साईटवर 'आर्थिक विश्लेषण आणि धोरण' विभागात जागतिक अर्थ व्यवस्था आणि संभवता संदर्भात माहिती दिली आहे. सन २०१९ आणि २०२० मध्ये जगाची अर्थ व्यवस्था विस्तारत असली तरी ती काहीशी क्षीण होऊन तिचा आलेख खाली घसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपसूक विकास प्रकल्प आणि त्याच्या वेगावर होत आहे. आर्थिक क्षेत्रात जोखिमा वाढत असून बहुतेक विकसनशील देशांचा विकास दर घसरला आहे. ठप्प होणाऱ्या व्यवहारांमुळे जगभराची अर्थ व्यवस्था डळमळीत झाल्याचे म्हटले आहे.

Thursday, 22 August 2019

'तुला काय व्हायचे, हे पाल्यास विचारा'

अनीश सहस्त्रबुध्दे यांचा पालकांना सल्ला

 'गप्पा इंडियाशी' या अभिनव उपक्रमात अनीश सहस्त्रबुध्दे (सोलापूर) यांना ऐकण्याची संधी मिळाली. आशा फौंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट यांनी संयुक्तपणे 'गप्पा इंडियाशी' हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निवेदन आणि गप्पा असा उपक्रम सुरु केला आहे. यात दरमहा एका मान्यवराला आमंत्रित केले जात आहे. नेहमीच्या कार्यक्रमांच्या चौकटीतून बाहेर पडून आशा फौंडेशन सोबत 'गप्पा इंडियाशी' या उपक्रमाला प्रायोजित केल्याबद्दल रोटरी क्लब वेस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. रोटरीने अजूनही काही पारंपरिक चौकटी मोडायला हव्यात. कारण चौकटी त्याच पण चेहरे केवळ बदलले याचा चौकटबद्ध प्रवास रोटरी भवनच्या भिंतीवरच लावला आहे.

Sunday, 11 August 2019

गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच !

कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वतः सहभागी होऊनही मोबाईल सेल्फी आणि व्हीडीओमुळे ना. गिरीशभाऊ महाजन भयंकर टीकेचे धनी ठरले आहेत. ना. भाऊंचे योग्य की अयोग्य अशा द्विधा मनःस्थितीत मी स्वतः होतो. मंत्र्याने पूरस्थितीची पाहाणी करायला हवी, आपदग्रस्तांना भेटायला हवे, मदत कार्यात लक्ष घालायला हवे, या गोष्टी योग्य वाटत होत्या. पण हे करीत असताना सेल्फी व व्हीडीओचा घोळ टाळता आला असता.

Monday, 29 July 2019

सोशल मीडियातील रुग्णांचे प्रकार

सोशल मीडियाचे पर्याय असलेल्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये शेअरिंग करणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना ४ वेगवेगळे आजार बळावल्याचे अनुभवाला येते. हे आजार शाब्दीक स्वरुपातील पोटशूळ, पोटदूखी, अजीर्ण आणि उलट्या या प्रकारातील आहेत. या आजारांची लक्षणे फारच साधी असतात. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये एखाद्या विषयी चांगल्या लेखनाची पोस्ट शेअर केली, की वरील चारही आजारातील रुग्ण सदस्यांची बोटे विरोधासाठी भराभरा किपैडवर चालू पडतात. अमूक व्यक्ती विषयी चांगले लिहिलेच कसे ? या प्रश्नाची अस्वस्थता घेऊन मग पक्ष, समाज, जात आणि नंतर व्यक्तिगत घसरणाऱ्या प्रतिक्रिया सुरु होतात. नुसत्या एक मेसेजने नाही भागले की, मेसेजची मालिका सुरु होते. भाषा हळूहळू अगदीच कुजकट पातळीवर जाते. मग संबंध नसलेल्या घटनांचा, व्यक्तिंचा उल्लेख सुरु होतो. काही उत्साही रुग्ण आपणच लिहिलेल्या पोस्टवर स्वतःच हास्याचे इमोजी टाकतात. असे करणे म्हणजे आजार बोटापासून मेंदूपर्यंत भयंकर बळावल्याचे लक्षण मानावे. अशा लक्षणांचे ४ आजार पुढील प्रमाणे आहेत.

Saturday, 20 July 2019

दोष कोणाला लावणार ?

जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल मधील बीग बाजार मॉल बंद करण्यात आला. व्यवस्थापनाने ३ महिन्यांचे वेतन अगाऊ देऊन मॉलची टाळेबंदी केली. २०० च्या आसपास पुरुष व महिलांचे रोजगार हिरावले गेले. जळगावमध्ये सर्व प्रथम मॉल कल्चर घेऊन आलेल्या विशाल मॉलनेही वर्षा-दीडवर्षांत जळगाव सोडले. तेव्हाही १०० वर जणांचा रोजगार गेला. यापूर्वी ब्लो प्लास्ट कंपनी गेली. कामगार बेकार झाले. रेमंड कंपनीने उत्पादने कमी केली. तेव्हा जळगावमधील कामगार असंतोषाचा भडका उडाला. अशा इतरही घटना आहेत. एकूण परिणाम काय, तर कंपनी बंद आणि कामगार बेरोजगार. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, जळगावमधील कामगार वा कर्मचारी असंतोषाचा.

Sunday, 14 July 2019

जळगावकर म्हणून घ्यायची पात्रता आहे ?

यावर्षीचा पावसाळा जळगावकरांसाठी मनःस्ताप घेऊन आला आहे. अमृत योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचा ऊत-मात झालेला आहे. घंटागाड्या जमेल तेवढा कचरा गोळा करीत असल्या तरी लोकांनी कॉलनींच्या मोकळ्या जागेत वा कचरा कुंड्यांजवळ टाकलेला कचरा उचलला जात नाही आहे. अशा स्थितीत जळगाव हे कचरा, घाण, माश्या, डास व मच्छरांचे गलिच्छ शहर झाले आहे. अर्थात, याचा दोष नेहमी प्रमाणे महानगरपालिकेवर फोडला जात असून अमृत योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांचे १२ वाजले असा ढोबळ दोष लावला जातोय. सोशल मीडियातून टीका टीपण्या करताना राजकीय पुढाऱ्यांना टीकेचे धनी केले जात आहे.

Wednesday, 19 June 2019

बाजार समितीतील नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील व्यापारी संघटन गेले १५ दिवस नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकाम विषयावरुन चर्चेत आहे. या प्रकरणाकडे सामान्य जळगावकरांनी अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. बहुधा कारण असावे की, हा वाद बाजार समिती, व्यापारी आणि नियोजित संकुलाचे बांधकाम करणारे विकासक यांच्यात असावा. या ३ घटकांमध्ये शेतकरी, तेथील हमाल-मापाडी व कर्मचारी सक्रिय दिसत नाहीत. या ३ घटकांच्या भल्यासाठी व्यापारी संघटनेने कृती केली आहे, असे सुद्धा काहीही दिसत नाही. मात्र, जागृत जनमंचचे श्री. शिवराम पाटील यांनी बाजार समिती पदाधिकारी व व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्याशी केलेल्या चर्चेच्या ध्वनी व चित्रफिती सोशल मीडियातून प्रसारित झाल्यानंतर नियोजित संकुलाचा विषय सामान्य जळगावकरांपर्यंत पोहचला. नियोजित संकुलास विरोध करताना बाजार समितीतील व्यापारी संघटनने बंद पुकारुन शेतकरी, हमाल-मापाडी व कर्मचाऱ्यांना वेठीस धरलेले आहे, असे दिसते. अशा स्थितीत बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल काय आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

Tuesday, 11 June 2019

जळगाव मधील व्यापाऱ्यांची 'चित भी मेरी और पट भी मेरी'

जळगावकर नागरिक जरा लक्ष द्या. शहरात नागरिक म्हणून राहायचे असेल तर तुम्हाला मनपाचा मालमत्ता कर व पाणी पट्टी भरावी लागेल. भलेही रस्ते, गटारी, पाणी, पथदीप, स्वच्छता आदी सुविधा मनपा देणार नाही. तरीही करवसुलीच्या नोटीसा नागरिकांच्या घरादारांवर चिटकवल्या जातील. पण तुम्ही जर जळगावात कशाचेही व्यापारी (बेपारी) असाल तर तुम्ही मनपा किंवा इतर संस्था यांचे भाडे, कर असे काहीही थकवू शकतात. तुम्ही व्यापारी म्हणून कधी एका नेत्याकडे तर गरज पाहून दुसऱ्याकडे जावू शकतात. बरे नेतेही एवढेच रिकामे की, नागरिकांचे भले करण्याऐवजी व्यापारी हिताचेच काम करणार. जळगावमधील व्यापारी स्वतःच्या लाभासाठी पुढाऱ्यांना कसे वापरतात याची ३ ठळक उदाहरणे समोर आहेत. एकात भाजपच्या नेत्यांनी, दुसऱ्यात शिवसेनेच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतली आहे. तिसऱ्या प्रकरणात व्यापाऱ्यांच्या मदतीने पोलिसांची वरकमाई सुरु आहे.

Thursday, 30 May 2019

बिनबुडाच्या २ टूम !!!

जळगाव शहराच्या व जिल्ह्याच्या राजकारणात २ टूम सध्या सोडल्या जात आहेत. कोणताही आगापिछा नसलेल्या या टुमांमुळे निव्वळ करमणूक होत आहे. पहिली टूम आहे ती भाजप-शिवसेना युती अंतर्गत जळगाव शहराच्या आमदारपदाची जागा शिवसेनेकडे जाणार. ही टूम निव्वळ गप्पा झोडणाऱ्यांनी सोडलेली आहे. जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तथा राजूमामा हे भाजपचे आहेत. जळगाव मनपात भाजपचे संख्याबळ शिवसेनेच्या ४ पट (५७) आहे. महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे आहेत. लोकसभा निवडणुकीत जळगावकरांनी भाजपला जवळपास ७१ हजारांवर मताधिक्य दिले आहे. भाजपला पूरक असलेल्या सद्यस्थितीत जर जळगाव शहर आमदाराची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली तर भाजपच्या पुढाऱ्यांना मूर्खात काढले जाईल. अजून एक बाब स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे शहर आमदाराची जागा भाजपकडेच राहिल आणि उमेदवार सुध्दा बदलला जाणार नाही.

Tuesday, 28 May 2019

गठ्ठा मतदान सिध्दांत मोडीत !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे विश्लेषण वेगवेगळे गृहितक मांडून त्यातून निघणाऱ्या निष्कर्षावर केले जाते आहे. यात एक निष्कर्ष असाही आहे की, जात-पात आणि समाजच्या गठ्ठा मतदानावर विजयी होण्याचा पूर्वीचा सिध्दांत मोडीत निघाला आहे. याच सिध्दांताच्या बळावर सत्तेत हिस्सेदारी मागणाऱ्या काही बहुचर्चित नेत्यांना मतदारांनी कसे पराभूत केले, या विषयावर काही उदाहरणांसह मी लिहिले आहे. परंतु लोकसभेच्या ५४३ जागांचा एकत्रित निकाल, झालेले मतदान, भाजपला ३०३ जागांसाठी मिळालेले मतदान याच्या टक्केवारीची पडताळणी करताना लक्षात येते की, संपूर्ण भारतातील मतदारांनी जात-पात व समाज याच्या गठ्ठा मतदानाचा संकुचित विचार बाजूला सारुन भाजपने मांडलेल्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला समर्थनषदेणारे मतदान केले आहे. अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या तळागाळातील मतदाराने व्यक्तिगत लाभ वा फायदा याच्याशी संबंधित आमिषे, लांगुलचालन, लोभ बाजूला सारुन आपले 'एक' मत भारतासाठी दिलेले आहे.

Saturday, 25 May 2019

हिस्सेदारीचा राजकीय डाव उध्वस्त

'मोदी है तो मुमकिन है', म्हणत नरेंद्र मोदी पुन्हा दिमाखात पंतप्रधान पदावर आरुढ होत आहेत. मोदींचा हा विजय महाप्रचंड आहे. सन २०१४ मध्ये भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. सन २०१९ मध्ये ३०३ जागा मिळाल्या आहेत. सन २०१४ मध्ये 'मोदी लाट' होती तर सन २०१९ मध्ये 'मोदी त्सुनामी' आली असे म्हटले जाते. या त्सुनामीत कोणाच्या हिस्सेदारीचे राजकीय डाव उध्वस्त झाले ? याचा डोळसपणे आणि वस्तुनिष्ठ विचार करायला हवा.  जात-पात व समाजाच्या संख्याबळावर राजकारण करीत सत्ता, शिक्षण व नोकरीत हिस्सेदारीची मागणी करणाऱ्यांना मतदारांनी उध्वस्त केले आहे. छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील मतदारांनी मोदीच्या बाजूने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हाच खरा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे.

Saturday, 18 May 2019

बोलती बंद ... पेपरवाल्यांची ... !!!

पंतप्रधानपदी १८१७ दिवस आरुढ झालेल्या (माणसाचे घोड्यावर बसणे या अर्थाने) नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. १७ मे २०१९ ला पहिली आणि शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदींनी ५२ मिनिटे हजेरी लावली. पण पत्रकारांच्या प्रश्नाला भाजप अध्यक्ष अमितशहा यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेत मोदींचे मौन हे दुसऱ्यादिवशी माध्यमांमध्ये टीकेचा विषय ठरेल हे अपेक्षित होते. अर्थात, शुक्रवारपासून लाईव्ह मीडिया व सोशल मीडियात मोदींना लक्ष केले गेले. सोशल मीडियात मोदी भक्त बैकफूटवर गेले.

Thursday, 16 May 2019

गिरीशभाऊ, बदलाचे वारे ओळखा ...

भारताच्या संसदीय राजकारणात विचार आणि विखार यात प्रचंड परिवर्तन करणाऱ्या लोकसभा  निवडणूक २०१९ ची प्रक्रिया अंतिम चरणात आहे. देशाशी संबंधित राष्ट्रवाद, समाजवाद आणि समानता या ३ विषयांवर २ टोकांच्या विचारात मतदारांची विभागणी झाली आहे. पाश्चात्य मासिक टाईम्सने भारताची विभागणी करणारे नेता असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हिंदुत्त्व आणि भगवा रंग याच्या भोवती राष्ट्रवाद व समाजवादाची भूमिका मोदींनी घेतली आहे. दुसरीकडे समाजवाद-समानता आणि एकता या विषयांच्या भोवती विरोधकांनी केवळ आणि केवळ मोदी विरोधाचे कडबोळे तयार केले आहे. कडबोळे एवढ्याचसाठी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यातील प्रादेशिक सुभेदाराने आपापला हिस्सा कायम ठेऊन मोदी विरोध सुरु ठेवला आहे. अशा वातावरणात लोकसभा निवडणुकीचे निकाल मोदींसाठी फारसे चांगले असणार नाहीत, असा दावा आता विरोधक करीत आहेत. भाजपच्या संभावित टेकूवाल्या सत्तेवर नेतृत्वाचा पर्याय म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या राजकारणात पितामह राजकारणी असलेले शरद पवार यांच्यासारखा विरोधकही नेतृत्व बदलात गडकरींच्या नावाचा उल्लेख करीत आहे. बदलाचे हे वारे सध्या तरी दिल्लीकडे वाहते आहे. मोदींच्या नावावर भाजपने खासदारांच्या साध्या बहुमताचा आकडा २८७ पार केला तर सारेच प्रश्न बाजूला पडतील. पण, मोदी टाळून काही विषय आला तर विरोधकांकडून गडकरी चर्चेत आहेतच. गरज पडेल तेव्हा संघ परिवार गडकरींना पसंती देतो याचा अनुभव २ वेळा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना आला आहे.

Sunday, 12 May 2019

'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगाव आवृत्ती

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हीडीओ' हा प्रचाराचा नवा डीजीटल पैटर्न जन्माला घातला. केंद्रात ५ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी सरकारच्या उलट्यापालट्या मत-मतांतरे, धोरणे आणि टीव्ही, चित्रपट माध्यमात गाजावाजा केलेल्या योजनांचा सरकारी प्रचार आणि वास्तव याची उलटतपासणी करणारे व्हीडीओ राज ठाकरेंनी सादर केले. जळगाव जिल्ह्यातही सरकारच्या अशाच गाजावाजा केलेल्या पंतप्रधान कौशल विकास योजने (PMKVY) च्या लाभार्थी म्हणून ज्याचा व्हीडीओ टीव्ही वरील जाहिरातीत वापरला त्याला ४ वर्षांत योजनेतील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रच दिलेले नाही. 'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगावीची आवृत्ती समजून घेऊ...

Thursday, 9 May 2019

इंदिरा व राजीव यांनी ओढवून घेतलेले मृत्यू ...

१७ व्या लोकसभा निवडणूक प्रचारात सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी गांधी घराण्यातील स्व. इंदिरा आणि स्व. राजीव हे देशासाठी शहीद झाल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. इंदिरा या पंतप्रधानपदी असताना २ शिख अंगरक्षकांकडून दि. ३१ आक्टोबर १९८४ ला निवासस्थानी मारल्या गेल्या. राजीव हे माजी पंतप्रधान असताना तामीळ टायगर्स (एलटीटीइ) या श्रीलंकास्थित दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात दि. २१ मे १९९१ ला श्रीपेरंबदूर येथे मारले गेले. इंदिरा व राजीव यांच्या या घातपाती मृत्यूमागे त्यांनी घेतलेले निर्णय आणि कृती याचे गुंतागुंतीचे संदर्भ आहेत. देशहितापेक्षा त्यामागे व्यक्तिगत पद-प्रतिष्ठा, कळीचे राजकारण आणि विरोधकांवर मात करणे हिच प्रमुख कारणे आहेत.

Monday, 6 May 2019

'बुकमार्क' गनीभाई मेमन ...

जळगावच्या सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून मोठ्ठे प्रभावलय निर्माण करणारे मित्र गनीभाई मेमन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या सहवासात आलेल्या आंबट-गोड अनुभवांविषयी लिहिण्याची आज खरी संधी. गनीभाई, हे जळगावच्या सामाजिक क्षेत्रात 'बुकमार्क' सारखे आहेत असे मला वाटते. पुस्तकाची पाने अनेक असतात. वाचन करताना ती मागे पुढे उलटवली जातात. आपण कोणत्या पानापर्यंत पोहचलो हे लक्षात ठेवण्यासाठी बुकमार्क वापरावे लागते. बुकमार्क पानांना वेगळे करीत असले तरी ते दोन पानांमधील मध्यस्थाच्या भूमिकेत असते. बुकमार्क म्हणजे पुस्तक नसले तरीळ दोऱ्याने बांधलेले बुकमार्क पुस्तकातील कोणत्याही पानांपर्यंत पोहचू शकते.

Sunday, 28 April 2019

दोन साहेबांच्या कोलांट उड्या ...

लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार नसलेल्या सेनेचे सर्वेसर्वा मा. राजसाहेब ठाकरे यांनी जाहीरसभांमध्ये डिजीटल स्क्रीनचा वापर करीत प्रचाराचा नवा ट्रेंड आणला आहे. नेत्यांच्या वक्तव्याचे जुने व्हीडीओ आणि अलिकडे भूमिका बदललेल्या वक्तव्यांचे नवे व्हीडीओ एकचवेळी पाठोपाठ दाखवून संबंधितांची लबाडी उघडी पाडण्याची ही साधी सोपी व भरपूर करमणूक करणारी पद्धत आहे. या पद्धतीने यूट्यूबवरील प्रेक्षक वाढला आहे.

Thursday, 10 January 2019

'अच्छेदिन' साठी जनआंदोलनाचे विधायक मार्ग ...

(अभिनीत जानेवारी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)
जनतेच्या विविध मागण्यांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे जनतेने संघटीत होऊन  जनमनातील असंतोष दर्शविण्याचा अवलंबिलेला कृतीशील मार्ग म्हणजे जनआंदोलन होय. जनआंदोलनाला जनचळवळ किंवा जनसत्याग्रह असेही म्हटले जाते. राज्य घटनेच्या माध्यमातून जनतेला सामान्य आणि व्यक्तिगत राहणीमानाचे नैतिक, सामाजिक, आर्थिक, भौतिक व कायदेविषयक हक्क वा अधिकार प्राप्त झाले आहेत. तरीही बदलत्या काळानुसार जनतेच्या अपेक्षीत गरजा जेव्हा सरकार पूर्ण करु शकत नाही तेव्हा जनमनातील असंतोष कृतीतून दर्शविण्यासाठी मोर्चा, उपोषण, असहकार, धरणे, निदर्शने, प्रतिबंध, रोको अशा आंदोलनांचा प्रभावी वापर जनतेकडून केला जातो. कोणताही अधिकार, हक्क मागणी करण्यामागे जनतेचा हेतू व्यक्तीगत अथवा कुटुंबाची सुरक्षा, संरक्षण, राहणीमानात सुधार घडवून आणणे हाच असतो. एक प्रकारे आपल्या आयुष्यात 'अच्छेदिन' यावेत म्हणूनच समाजातील सर्वच घटकांना संघटीत होऊन समाजमनांतील अस्वस्थता दर्शविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे.

Tuesday, 8 January 2019

जळगाव शहराचे प्रश्न सोडवायचे कसे आणि कोणी ?

जळगाव शहरातील बहुतांश नागरी प्रश्नांचे भीजत घोंगडे पडले आहे. जळगावकरांनी सत्तेतील लोकनेत्यांचे चेहरे बदलवणारा कौल सार्वत्रिक निवडणुकांमधून दिला. त्यानंतर लोकांसाठीच्या सामुहिक सेवा - सुविधांमध्ये काही परिवर्तन घडून येईल अशी अपेक्षा केली. सरकार बदलले, सत्ता बदलली, सत्ता राबविणारे मंत्री आणि प्रशासनही बदलले पण जळगाव शहराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे काही अजून सापडलेली नाहीत.