Friday 8 July 2016

“मंत्री गुलाबभू” जरा जपूनच !!

मंत्री गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस
(मजकूर कॉपी पेस्ट करू नका ... वाटले तर लिंक फॉर्वर्ड करा ... लेखातील संदर्भ वापरले तर तसे लिहा...)


 निवडणुकीत तीन विजय आणि एक पराभव पचून आजही लढवय्या नेते अशी प्रतिमा असलेल्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना अखेर राज्याच्या युतीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. ज्या परिस्थितीत गुलाबभू मंत्री झाले ती फारशी अनुकूल नाही. परिस्थिती कशी प्रतिकूल आहे हे शांतपणे समजून घेतले तरच राज्यमंत्रीपदाचा जिल्हा, मतदारसंघ व कार्यकर्त्यांसाठी उपयोग करून घेता येईल. परिस्थिती समजून घेणे जेवढे गुलाबभू यांना गरजेचे आहे तेवढेच ते त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांसाठीही आवश्यक आहे. 

लढवय्या आमदार म्हणून असलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडून राज्यमंत्री म्हणून वागता येणार नाही, हे सर्व प्रथम लक्षात घ्यावे. आमदार होण्यापूर्वी मी टपरीवरचा आमदार होतो, अशी आपली ओळख सांगणे हे काही काळापुरते बरे आहे. आता ती ओळख राज्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेपर्यंत पोहचली आहे. आमदार म्हणून रस्त्यावर बुलेट फिरवणे, लेझीम हाती घेवून नाचणे हे सर्व सामान्य माणसाला आवडत नाही. ते आवडते मूठभर हितचिंतकांना, चापलूस लोकांना. सामान्य माणूस रस्त्यावर नाचणाऱ्याला मनमौजी, खुशालचेंडूच समजतो. एवढेच की तोंडावर कोणी बोलत नाही. मंत्री रस्त्यावर नाचणारा नसावा. मंत्री विकासाच्या रस्त्यावर चालणारा असावा. अशा प्रकारच्या वर्तणुकीचा गृहपाठ गुलाबभू यांनी जिल्ह्यातूनच करून घ्यावा.

गुलाबभू यांच्यावर कारागृहात जाण्याची नामुष्की ओढवली आहे. शैक्षणिक संस्थेच्या वादाचे प्रकरण आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाचाही विषय असून घेतलेले कर्ज वेगळ्याच कामासाठी वापरले गेले असे सातबाराच्या उताऱ्यावरून दिसते. हे प्रकरणही पोलीसात त्रासाचे ठरू शकते. अशा प्रकारचा ताजा इतिहास असतानाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुलाबभू यांना राज्यमंत्रीपद देण्याची रिस्क घेतली आहे. अर्थात, असे शिवसेनेतच होवू शकते. दुसरीकडे, आरोप झाले म्हणून भाजपच्या श्रेष्ठींनी एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद तूर्त काढून घेतले आहे. गुलाबभू आरोपानंतर चौकशीच्या कोठडीत जावून आले आहे. म्हणूनच स्थिती फार अनुकूल आहे असे समजण्याचे कारण नाही.

गुलाबराव पाटील यांना मंत्रीपदाची शपथ देताना राज्यपाल
 खडसे आणि गुलाबभू यांच्यातील वादाची प्रकरणे बदनामीच्या खटल्याच्या रुपात न्यायालयात दाखल आहेत. मात्र, गुलाबभू यांच्या आईच्या निधनानंतर दारावर बसायला जावून खडसे यांनी सकारात्मक पाऊल टाकले. अशा दुखःद प्रसंगातून कोणताही अर्थ काढण्याचे कारण नाही. त्यानंतर ग्रामसेवकांच्या मेळाव्यात खडसे, मंत्री गिरीश महाजन व गुलाबभू तिघे एकत्र आले. तेथेही कटुता निर्माण होईल असे काही घडले नाही. पण, गुलाबभू यांनी तेथे व्यक्त केलेल्या अपेक्षेत थोडा बदल झाला आहे. सरकारमधील अडचणी मंत्री म्हणून दोघे भाऊ म्हणजे खडसे व महाजन सोडवतील असे गुलाबभू म्हणाले होते. आता राज्यमंत्री म्हणून गुलाबभू स्वतःही सरकारमध्ये जावून बसले आहेत. त्यांना खातेही सहकार मिळाले आहे.

राज्य सरकारच्या गेल्या सव्वा दोन वर्षांच्या काळातील कामगिरीवर टीका करताना गुलाबभू कृषी खात्यावर जास्त टीका करीत. अर्थात, यामागे खडसे आणि त्यांच्यातील कडवट मतभेद कारणीभूत होते. आता नियतीने राज्यमंत्री म्हणून गुलाबभूच्या हाती मंत्रालयाचे काही अधिकार देवून टाकले आहेत. त्याचा लाभ राज्य, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकाराच्या माध्यमातून मिळवून दाखवावा. शिवाय, गुलाबभू यांनी मंत्रीपदाची शपथ शेतकऱ्यांना स्मरुन घेतली आहे. हे विसरुन चालणार नाही. गुलाबभू यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपद १९९७-९८ या वर्षी सांभाळले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी सहकाराशी संबंधित कोणत्या योजना असतात याची किमान माहिती आहे.

मंत्री म्हणून सही करताना गुलाबराव पाटील
राज्यमंत्री म्हणून काम करताना गुलाबभू यांनी लक्षवेधी काम करावे. अती उत्साही कार्यकर्त्यांना किंवा वाद विवादाच्या विषयांमध्ये प्रतिष्ठा पणाला लावण्याचा आग्रह करणाऱ्यांना थोडे लांबच ठेवावे. पोलीस ठाण्याशी संबंधित विषयांमध्ये थेट लक्ष घालू नये. आमदार म्हणून दाखवायचा लढवय्यापणा वेगळा आणि मंत्री म्हणून लोकांविषयी कायद्याच्या भाषेत दाखवायची जबाबदारी या गोष्टी वेगळ्या आहेत. कधीकाळी गुलाबराव पाटील यांच्याविषयी गुलाबराव पाटील को गुस्सा क्यों आता है ?” अशी विचारणा करणारा लेख लिहीला होता. आज मंत्री गुलाबराव जरा जपूनच असा मैत्रीपूर्ण सल्ला देण्याचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती प्रतिकूल असण्याचे अजून एक कारण आहे. ते म्हणजे, जिल्ह्यात मराठा बहुल, लेवा बहुल समाजाचे वर्चस्व असताना दोन्ही समाजातील नेत्यांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान नाही. गुजर बहुल समाजातील गिरीश महाजन आणि गुलाबभू यांना स्थान मिळाले आहे. कोणी कितीही नाकारले तरी समाज आणि सत्तेतील विषमतेचा हा विषय सामान्य लोकांच्या मनांत नाराजी निर्माण करतोच. अशावेळी इतर समाजांची फारशी नाराजी ओढवली जाणार नाही याची काळजी गुलाबभू यांना घ्यावी लागेल.

राज्यपालांच्या ही शुभेच्छा
गुलाबभू यांनी कोणाला प्रखर विरोध केला म्हणून राज्यमंत्रीपद मिळाले असे ज्यांना समजायचे त्यांना समजू द्या. गुलाबभूने मात्र मंत्रीपदाचा वापर सामाजिक कार्यासाठी करावा. सत्तेचे कोणतेही पद पक्षश्रेष्ठी जसे देतात तसे ते हिरावूनही घेतात. मंत्रीपदाचे क्वालिफिकेशन तीव्र विरोध हे असू शकते. पण कार्यक्षम मंत्री ही ओळख कायम राहावी असे वाटत असेल तर कोत्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. राज्यातील भाजप नेतृत्वातील सत्तेत शिवसेना सहभागी आहे, ती पक्षश्रेष्ठींच्या मर्जीच्या काळापुरती. ज्या दिवशी संसार मोडायचा ठरेल तो दिवस सत्तेतील शेवटचा. तो कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. बहुदा तो येणारही नाही. म्हणूनच मंत्रीपद आहे ते लोकांसाठीच लाभदायी व्हावे म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. गुलाबभू मंत्रीपद स्वकीयांसाठी वापरतील अशी स्थिती कुटुंबात तरी नाही.

गुलाबभू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रतिष्ठा ही न्यायालयात खटले दाखल करून परत मिळत नाही. कारागृहात गेले म्हणून प्रतिष्ठा कमीही होत नाही. प्रतिष्ठा ही लोकांच्यासाठी केलेल्या सकारात्मक कार्यातून मिळते. तसे कार्य वाढवत नेले की, प्रतिष्ठाही वाढते. त्याच्यासाठी वृत्तपत्रातील जाहिरातीसुद्धा द्याव्या लागत नाहीत. जनताच तुमचा प्रचार-प्रसार करते. गुलाबभू असे कार्य आपल्या हातून घडावे ही अपेक्षा ठेवून लेखन केले आहे. तुमच्या राज्यमंत्रीपदाच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा.

खडसेंच्याही शुभेच्छा 

गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता माजीमंत्री तथा माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले,  ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले याचा आनंद आहे. जळगावसह खान्देशाचा विकास व्हावा यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा होता. त्यासाठी शिवसेना असो किंवा काँग्रेसचा मंत्री असो त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे आपण स्वागतच केले आहे, खान्देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा हीच यानिमित्ताने अपेक्षा होती. जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गुलाबराव यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून कामे करावे.

गुलाबभू विषयी विशेष ...

उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुलाबराव पाटील, किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे
गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या परिचयाचा सकारात्मक मजकूर सोशल मीडियात फिरला. त्यात तपशील असा होता की, ते नशीब पान सेंटर चालवित असत. ते तमाशात काम करीत असत. अर्थात, गुलाबराव यांनीच असे सांगितल्याचाही खुलासा त्यानंतर आला. गुलाबराव व्हीआयपी कंपनीत होते आणि त्यांची पानटपरी नव्हती असाही मजकूर लगोलग इतरांनी सोशल मिडियात फिरवला. या संदर्भात गुलाबभू यांच्या निवासाचे गाव पाळधी (ता एरंडोल) येथे संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांच्या जवळच्या पत्रकाराने सांगितले की, गुलाबभू हे मूळचे लादली गावाचे आहेत. ते पाळधीपासून ५ किलोमीटरवर आहे. गुलाबभू अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ते पाळधी येथे मावशीकडे आले. मावशीच त्यांची आई झाली. काका सुद्धा मावसाच होते. याच कुटुंबाचे गुलाबभू वारस झाले. युवावस्थेत ते पाळधीत व्हिडीओगृह चालवत. जमेल तेव्हा नाटकात कामे करीत. ते गाणेही छान म्हणतात. त्यांची मॅटोडोरही होती. व्हिडीओगृहाजवळ ठाकूर पान कॉर्नर आहे. तेथेच ते बसत. म्हणून गुलाबभू यांना पान टपरीचालक शब्द चिकटला. ही पान टपरी सुभाष ठाकूर यांची आहे. गुलाबभू १२ वी शिकलेले आहेत. १९८७ पासून शिवसैनिक, नंतर तालुका उपप्रमुख, जिल्हा प्रमुख (१९९६), धुळे संघटक, पंचायत समिती सदस्य (१९९२-९७), जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती (कृषी) (१९९७-९८) , तीनवेळा आमदार (१९९९-२००४, २००४-२००९, २०१४ पासून आतापर्यंत). गुलाबभू १९९३ मध्ये शिवसेना उपनेते होते. हा मान स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मिळाला होता. गुलाबभू विषयी असे सांगितले जाते की, त्यांचा खडा आवाज लक्षात घेवून जळगाव आकाशवाणी केंद्रावर त्यांची उद्घोषक म्हणून निवड झाली होती. मात्र नंतर ती संधी स्व. भय्या उपासनींकडे गेली.

No comments:

Post a Comment