Sunday 3 April 2016

जामन्याचा आदिवासी होलिकोत्सव

आदिवासी नृत्य पथकातील बावा, बुध्या
सातपुडा पर्वताच्या रांगेत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशात आदिवासी संस्कृती विस्तारली आहे. बोली भाषा, प्रांत आणि पोषाख भिन्न असले तरी या सर्व आदिवासींची पारंपारिक होळी साजरी करण्याचा रितिरिवाज आजही कायम आहे. आदिवासींमध्ये बांबूच्या होळीचा उत्सव मोठ्या श्रध्देने साजरा होतो. यानिमित्त संपूर्ण आदिवासी समाज नृत्य, वादन, गायन आणि वस्त्र-प्रावरणे-दागिने याचे प्रदर्शन करतो. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात जामन्या येथे बांबूच्या होलिकोत्सवाला लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने दि. २६ मार्च २०१६ ला प्रारंभ झाला. ही नोंद आदिवासींच्या व जळगाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली आहे. या होलिकोत्सवाची रंजक कहाणी ...
यावल अभयारण्याचा अति अंतर्गत भाग असलेल्या जामन्या पाड्यावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे गेल्या २६ मार्चला आदिवासी होलिकोत्सवाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. या उत्सवाच्या प्रारंभाची नोंद लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने झाली. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्यासह जळगाव शहरातील सुमारे २०० वर मान्यवरांनी या होलिकोत्सवाला हजेरी लावली. एक नवा सांस्कृतिक इतिहास लिहीला जात असताना त्या उत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या मंडळींना लाभले.



ना. गिरीश महाजन, सौ. साधना महाजन, प्रतिभाताई शिंदे


या होलिकोत्सवासाठी प्रतिभाताईंनी मलाही आग्रहाने बोलावले होते. मी आणि जैन स्पोर्टचे प्रमुख फारुक शेख, विवेक आळवणी आणि तीन-चार जण होलिकोत्सवासाठी जामन्याकडे उशिरा रवाना झालो. पाल येथे पोहचायला रात्रीचे ११ वाजल्यामुळे आम्ही तेथून जळगावकडे परत फिरलो. होळी हुकल्याची रुखरुख मनाला होती. मात्र, दुसऱ्या दिवशी प्रतिभाताईंशी बोलून होलिकोत्सवाचा आँखोदेखा वृत्तांत मिळवला. कधीकधी माध्यमेही करंटेपणा करतात. आपल्या भागातील ऐतिहासिक घटनांची नोंद हातात लेखणी बाळगणारे करू शकत नाहीत. मी रविवारची प्रतिक्षा केली. कोणत्याही दैनिकात जामन्याच्या होळीवर रविवारचा लेख दिसला नाही. फेसबुक सारख्या सोशल मीडियावर दोन-चार जणांचे फोटो होते मात्र, होलिकोत्सवाचे वर्णन, महत्त्व शब्दांत नव्हते. अखेर म्हटले आपणच लिहून काढू.

मी नंदुबार जिल्ह्यात बातमीदार म्हणून काम केले आहे. ते दिवस सरदार सरोवर प्रकल्पास विरोध करणाऱ्या मेधाताई पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचे आणि विस्थापितांच्या  पूनर्वसनाचा प्रश्न मांडणाऱ्या प्रतिभाताई शिंदे यांचे होते. या दोन्ही नेत्यांमुळे सातपुडा आणि तेथील आदिवासी आमच्या लेखणी आणि नजरेला दिसले, समजले. प्रतिभाताईंमुळे धडगाव तालुक्यातील काठी येथील बांबूची राजवाडी होळी २/३ वेळा अनुभवली. के. सी. पाडवींमुळे असली येथील होळी पाहिली.
होळीच्या दांड्या भोवतीचे रिंगण
जळगाव जिल्ह्यातील आदिवासींच्या वन हक्क दाव्यांची प्रकरणे मार्गी लावायला प्रतिभाताई २/३ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यासाठी लोकसंघर्षचा पुढाकार आहे. आंदोलन करताना जळगाव जिल्ह्यातील, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील आदिवासी समाज प्रतिभाताईंच्या संपर्कात आला आहे. आदिवासींमधील होलिकोत्सवाचे महत्त्व प्रतिभाताईंना माहित आहे. लोकांच्या मनांतील विश्वास अधिक दृढ करणे आणि लोकसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करताना पठारावरील मान्यवर पांढरपेशी समाज आदिवासींशी जोडणे याच हेतूने प्रतिभाताईंनी जामन्याला बांबूचा होलिकोत्सव सुरु केला. या उत्सवाच्या प्रारंभातून अनेक ठळक आणि अबोल उद्देश साध्य होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील आदिवासींच्या वन हक्क दाव्यांची प्रकरणे मार्गी लावायला प्रतिभाताई २/३ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यासाठी लोकसंघर्षचा पुढाकार आहे. आंदोलन करताना जळगाव जिल्ह्यातील, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील आदिवासी समाज प्रतिभाताईंच्या संपर्कात आला आहे. आदिवासींमधील होलिकोत्सवाचे महत्त्व प्रतिभाताईंना माहित आहे. लोकांच्या मनांतील विश्वास अधिक दृढ करणे आणि लोकसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करताना पठारावरील मान्यवर पांढरपेशी समाज आदिवासींशी जोडणे याच हेतूने प्रतिभाताईंनी जामन्याला बांबूचा होलिकोत्सव सुरु केला. या उत्सवाच्या प्रारंभातून अनेक ठळक आणि अबोल उद्देश साध्य होणार आहेत.

होळी नृत्य पथकात सहभागी मान्यवर
यावल अभयारण्य क्षेत्र १७७.५८ चौरस किलोमीटर आहे. जामन्या वन्यक्षेत्रात जामन्या, पांढऱ्या, उसमुळी, लंगडाआंबा अशी वसतीस्थाने आहेत. या भागात लोकसहभागातून जंगल पूनर्निर्माणचे काम लोकसंघर्ष मोर्चा करीत आहे. तसेच हा परिसर जंगली प्राण्यांच्या निवासाकरिता आरक्षित असून तेथे ठिबकेदार बिबट्या आढळला आहे. अशा जमेच्या बाजू लक्षात घेवून इको टुरिझम संकल्पनेवर आधारित जामन्याचे सुक्ष्म नियोजन प्रतिभाताई व त्यांच्या सोबतींनी सुरु केले आहे. होलिकोत्सव आयोजन त्याचीच एक पायरी आहे.

पालपासून जवळपास ३० किलोमीटवर जामन्या आहे. गाव आणि पाडा यातील वस्ती. आदिवासींमधील पावरा समाजाच्या १२००/१५०० झोपड्या असतील. तेथे पहिल्यांदा आदिवासींची बांबू होळी साजरी झाली. या पहिल्या ऐतिहासिक उत्सवाचा प्रारंभ खासदार खडसे यांच्या हस्ते झाला. सुमारे पंधरा हजार आदिवासी यात सहभागी झाले. रावेर, यावल, चोपडा तालुक्यासह नंदूरबार, अक्कलकुवा व मध्यप्रदेशातील आदिवासी उपस्थित होते. त्यांनी नृत्य, वादन, गायन आणि वस्त्र प्रावरणे घालून उपस्थित मान्यवरांचे रंजन केले. सायंकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची रंगत उत्तररात्री रंगत गेली. मान्यवरांनी आदिवासींसोबत नृत्य केले, पोषाख, टोप घालून फोटो काढून घेतले. मध्येच पावसाने हजेरी लावून उत्सवात धांदल उडविली. पहाटे पहाटे होळीचा बांबू दांडा पेटविण्यात आला.
 
आदिवासी टोप घालणारी मान्यवर महिला
या उत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातील पठारावरून आलेल्या २०० मान्यवर महिला-पुरुषांची मुक्कामाची व्यवस्था जामन्या येथील रहिवाशांकडे ५/६ च्या गटाने केली होती. त्यांच्याकडेच खिचडीचाही बेत होता. सुमारे १५ क्विंटल डाळ-तांदुळ खिचडीसाठी लागला. आदिवासींच्या या आदरातिथ्याने मान्यवर भारावले. होलिकोत्सवाचा रंग सायंकाळपासून रंगू लागला. पाड्याच्या मध्यभागी होळीचा दांडा रोवला होता. तेथेच कलापथकांचे सांस्कृतिक रिंगण होते. प्रतिभाताईंनी नंदुरबार, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून बावा, बुध्या व मोरखी यांना बोलावले होते. याच पथकांमुळे आदिवासींचे सांस्कृतिक व सुसंस्कृतपण इतरांना समजते. कमरेभोवती सुकलेले भोपळे लटकावून पारंपरिक पोषाख करणारे बावा असतात. नवस बोलणारे तथा मोरपीस बांधणारे तसा टोप घालणारे बुध्या असतात. तलवार किंवा तत्सम शस्त्र बाळगणारे मोरखी किंवा घेऱ्या असतात. आदिवासींचे टोप रंगीत किंवा बेगडी कागद व कामटी पासून बनविलेले असतात. काही जण यात चायना लाईटींगचा वापर करतात. महिलांच्या डोक्यावर फिरणारी सुपळी असते. अंगावर चांदीचे सऱ्या, चोसऱ्या, कंबरपट्टे, बाजुबंद असे दागिने असतात. नंदुरबारकडे होळीच्या आधी भरणारा बाजार भोंगऱ्या असतो किंवा नंतर भरणारा बाजार मेलदा असतो.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि जळगांव जिल्ह्यातील चोपडा, यावल व रावेर तालुक्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद आदी सातपुड्याच्या परिसरातील गाव-पाड्यांवर बांबूची होळी करतात. नंदुरबार जिल्ह्यातही हिच होळी असते.

रिंगण नृत्यात मान्यवर
होळीचा दांडा (सर्वांत उंच बांबू) गुजरातच्या जंगलातून आणला जातो. साधारण महिनाभरापूर्वी त्याचा शोध सुरू होतो. त्यासाठी युवकांचा गट गावाबाहेर पडतो व तो दांडा गावात आणेपर्यंत व्रतस्थ असतो. दांडा गावात आला की त्याला ग्राम दैवताजवळ ठेवतात. होळीच्या दिवशी गावनिहाय मानकरी त्याची पूजा करतात. मध्यरात्री दांडा होळीच्या ठिकाणी मिरवणुकीने आणतात. तो रोवण्यापूर्वी इतर ग्रामस्थ होळीच्या जागेतून थोडी माती काढून बाहेर फेकतात. होळीचा खड्डा असाच खणला जातो. नंतर दांडा रोवला जातो. तेथे रात्रभर स्त्री-पुरूष पांरपरिक नृत्य करतात.

पहाटे ५ च्या दरम्यान होळी पेटविली जाते. होळी पेटविण्याचा मान त्या त्या गावाच्या पोलीस पाटलांचा, गाव कारभारीचा असतो. होळी पेटविल्यानंतर सर्वजण खोबरे, गुळ, डाळ्या होळी मातेला अर्पण करून दर्शन घेतात. कपाळावर राख लावून वंदन करतात. नवसकरी व विविधरूप धारण केलेले कलापथक होळीच्या भोवती धावत धावत ५ फेऱ्या मारतात. नंतर घराकडे परततात.

होळी पेटल्यानंतर बांबूचा बुंधा जळतो आणि वरचा दांडा कोसळतो. तो पूर्व दिशेला पडावा असे नियोजन असते. पडणादा दांडा अंधातरीत झेलतात. हा दांडा इतर गाव-पाड्यांचे मानकरी कोयत्याने एका घावात तोडतात. तो तुकडा मानाचा म्हणून सोबत नेतात. नंतर उरलेला शेंडीचा भाग गोलाकार (त्रिज्यासारखे) फिरवून लोकांना त्याचे दर्शन घेवू देतात. या शेंडीची मेलादा बाजारातून सवाद्य मिरवणूक काढून सर्वांना दर्शन दिले जाते. होळीजवळ नवस बोलणारे असतात. ते पुढे दिवस किंवा वर्षभराचा नवस बोलतात. तसे व्रतस्थ राहतात. अशा प्रकारे आदिवासींच्या होलिकोत्सवाची सांगता होते.

प्रतिभाताईंमुळे जळगाव जिल्हावासियांना आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. जामन्यचा होलिकोत्सव असाच रंगातदार साजरा झाला. नेहमीसाठी लक्षात राहणारा ...

(फोटो व माहिती सौजन्य - प्रतिभाताई शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा, जळगाव)

No comments:

Post a Comment