
रणातून हे सारे घडते.
‘व्हेलंटाईन’ची कथा रोमन साम्राज्याशी संबंधित आहे. रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळात ‘संत व्हॅलेंटाईन’ याने प्रेमविरांना भेटविले असा संदर्भ दंतकथांमधून आहे. क्लॉडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. त्यामागे कारण होते की, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन साम्राज्य किंवा देशासाठी लढत नाहीत. त्यावेळी ‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली. भावना प्रेमाची असली तरी तो एका संताचा स्मृती दिन आहे हे लक्षात घ्यावे.
भारतीय संस्कृतीतही प्रेमदिनाचे खुपच रोमांचक मुहूर्त आहे. आपल्याकडे त्याचा प्रचार व प्रसार झालेला नाही. ‘हे विश्वची माझे घर’ किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे म्हणणारी भारतीय संस्कृती जगभरातल्या सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा असा संदेश देते. स्त्री पुरुष मिलनाची देवताही भारतीय संस्कृतीत असून परस्परांसाठी समर्पणाच्या सुरेख, रोमांचक आणि सत्व, तत्व, ममत्व सिध्द करणार्या पौराणिक कथाही आहेत. या कथांमधील संदेश स्त्री पुरुषांनी नीट समजावून घेतला तर ‘व्हेलंटाईन डे’ आणि ‘वसंत पंचमी’ यातील फरक आणि महत्त्व लक्षात येईल.
‘कामदेव’ हा पाश्चात्य संस्कृतीमधील ‘क्युपिडचाच’ म्हणजे ‘मदनबाळ’ चाच भारतीय संस्कृतीतील अवतार. ‘कामदेव’ व ‘मदनबाळ’च्या हातात हृदयाला प्रेमविभोरांनी घायाळ करणारे ‘प्रेमबाण’ असतात. एवढेच काय ते साम्य ‘व्हेलंटाईन डे’ आणि ‘वसंत पंचमी’त मानावे. त्या व्यतिरिक्त ‘वसंत पंचमी’त दाम्पत्य जीवन यशस्वी करण्याचे मतितार्थ सामावलेले आहेत.
‘वसंत पंचमी’ हा भारतीय तरुणाईने प्रेमदिवस म्हणून साजरा करायला हवा. प्राचीन साहित्यात, ऐतिहासिक कथा-कवितांमध्ये ‘वसंत पंचमी’च्या दिवशी तरुण, मुले-मुली कशाप्रकारे एकत्र येत, नाच-गाण्यांमध्ये रंगून जात याचे अनेक संदर्भ आढळतात. आजही अनेक ठिकाणी ‘रती-मदना’ची पूजा केली जाते. खास करून आपले वैवाहिक आयुष्य सुखी राहावे यासाठी ही पूजा करण्याचा प्रघात होता. आज तो काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘व्हेलंटाईन डे’च्या गुळगुळीत प्रसिध्दीत ‘वसंत पंचमी’चे पावित्र्य हरविले आहे.
माघ शुक्ल पंचमीला वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतुंचा राजा असे वसंतऋतुला संबोधले जाते. नवसृजन, चैतन्य, आनंद, उत्साह याचे लेणे घेऊन वसंत येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्त हस्ते उधळण करीत येणाऱ्या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून ‘वसंत पंचमी’ साजरी करतात. ‘वसंत पंचमी’ साजरी करण्यामागे इतरही काही चांगले संकेत आहेत.
प्रेम देवता ‘कामदेव’ तथा ‘मदना’चा जन्म ‘वसंत पंचमी’चा आहे. मदन आणि रती हे पती पत्नी. सहजीवन आणि सहमिलनाचे प्रतिक. माणसाच्या मनात स्त्री सहवासाची आभिलाषा उत्पन्न करणारा ‘मदनबाण’ कामदेवाच्या हातात. देवादीकांसह दैत्य प्रवृत्तीला मोहित करणारे ‘मादक सौंदर्य’ रतीच्या ठायी. असे मनमोहक आणि मादक दाम्पत्य म्हणजे ‘मदन-रती’. दोघांच्या मिलनात आहे प्रेम, सौंदर्य आणि शृंगार.
‘वसंत पंचमी’चे महत्त्व इतरही मुहूर्तांसाठी आहे. या दिवशी शेतकरी शेतात वाढ झालेल्या नवीन पिकांच्या लोंब्या घरी आणून त्या कुलदेवतेला अर्पण करतो. त्या पासून तयार केलेले ‘नवान्न’ ग्रहण करतो.
पुराणात उल्लेख आहे की, ‘वसंत पंचमी’ला विद्येची देवता सरस्वतीदेवी उत्पन्न झाली. म्हणून तिची पूजा लेखक, कलावंत करतात. लक्ष्मीचाही हाच जन्मदिन मानला जातो. म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.
दीपावलीच्या दिवशी महालक्ष्मीचे ‘आवाहन’ केले जाते ते कुटुंबात स्थिरावण्यासाठी. मात्र, ‘वसंत पंचमी’ ला सरस्वतीची स्थापना करून पूजा केली जाते ती शब्द आणि कलांच्या उत्तम सृजनासाठी. महालक्ष्मीला आगमनाचे ‘आवाहन’ तर सरस्वतीला ‘सृजनाची विनंती’ करणे हा पुजनातील मूलभूत फरक आहे. सृजन हे शब्द, नृत्य, वाणी, गायन, वादन, रंग-रेषा-छाया चित्रण या कलांशी संबंधित आहे. म्हणून सरस्वती पूजनाचा मुहूर्त कलाकार व कलावंतांनी चुकवू नये. आजकालची अनेक व्यावसायिक कौशल्ये ही सुध्दा सृजनाचेच अविष्कार आहेत. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील कुशल कौशल्य असलेली मंडळी सरस्वती ही आपल्या जिव्हा, कान, डोळे, हात, पाय आणि मेंदूत स्थिरावण्यासाठी तीचे पूजन करतात. किंबहुना तसे ते केले पाहिजे.
‘कामविकार’ आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न पुराणांच्या अनेक कथांमधून आहेत. इंद्राने कपटातून आणि ऋषीपत्नी अहिल्येने स्वसौंदर्याच्या गर्वातून मूक संमतीने केलेला शृंगार, राजा दुष्यंताने शकुंतलेसोबत नावेत प्रणय, ब्रम्हदेवाच्या मनांत स्व पूत्री संध्याविषयी निर्माण झालेली अभिलाषा, प्रतिज्ञाबध्द भीष्माच्या मनातही कन्यारुपातील देवर्षी व्यासांनी निर्माण केलेली अस्वस्थता, पार्वती विरहाने व्याकूळ होवून कठोर तप करणार्या शंकराचा कामदेव-रतीने केलेला तपोभंग, रतीमिलनात मृत्यू आहे हे माहित असून पांडूने माद्री सोबत केलेली कामक्रीडा, दैत्य कुळातील शुर्पणखेला मानव कुळातील लक्ष्मणाविषयी निर्माण झालेले आकर्षण, विवाहीता सितेचे हरण करून विवाहित रावणाने तिची विवाहासाठी केलेली मनधरणी, वानरराज बालीने भाऊ सुग्रीवच्या पत्नीचे केलेले हरण, प्रभू रामचंद्राकडून बाली हत्येनंतर त्याची पत्नी ताराने वानरराज सुग्रीवशी केलेला विवाह, रावण वधानंतर मंदोदरीने राजा बिभिषणशी केलेला विवाह, ऋषि पाराशरने सत्यवती सोबत केलेला संबंध, बृहस्पतिची पत्नी ताराचे चंद्राने केले हरण, राजा नरकच्या वधानंतर कृष्णाने १६ हजार बंदीनींशी केलेला विवाह, राजा दण्डने शुक्राचार्यची पुत्री अरजा सोबत केलेला दुर्व्यवहार, वायु देवताने राजर्षि कुशनाभच्या कन्येचा केलेला मानभंग, विष्णूने जालंदरची पत्नी वृंदासोबत केलेला अशिष्टाचार असे अनेक प्रसंग कामविकारातून अनैतिक आणि अनितीचे प्रसंग मानवा समोर उभे करतात.
पुराण कथा या एकवेळ दंत-मौखिक किंवा भाकड कथा मानल्या तरी त्यातून आजही मानवाच्या मन-वर्तनात उत्पन्न होणारा विविधांगी कामविकार स्पष्ट करतात. अर्थात, या कथांचे वाचन करताना त्या मागील नियतीचा नंतरचा न्याय सुद्धा लक्षात येतो. शाप, उपःशाप, शिक्षा, प्रायश्चित्त अशा कारक कारणांतून कामदेव व रतीच्या सकारात्मक व नकारात्मक बाबींची माहिती होते.
वरील सर्व प्रकारचे कामविकार हे सर्व सामान्य माणसाच्या दम्पती जीवनात कधीही उद्भवू शकतात. माणसाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जिवनात ‘कामशांती’ असेल तर त्याचे ५० टक्के प्रश्न सहजपणे सुटतात. म्हणूनच ‘वसंत पंचमी’ ला विद्येची देवता सरस्वतीसह कामदेव-रती पूजनाचेही महत्त्व लक्षात घ्यायला हवे.
कोण आहे कामदेव?
हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरूण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता म्हणजे कामदेव. त्याचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. नंतर पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने त्याचा जन्म झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन अशीही त्याची नावे आहेत. कामदेवाची अस्त्रे धनुष्य व बाण आहेत. त्याचे धनुष्य इक्षुदंडाचे (अत्यंत लवचिक) असल्याचाही उल्लेख आढळतो. रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत. संमोहन, उन्मादन, शोषण, तापन व स्तंभन हेही काम बाण मानले जातात. याचा बाणांमुळे तो तरुण-तरुणींची हृदये विद्ध (घायाळ) करतो. प्रणयाराधनेचा वसंत हा सर्वांत चांगला हंगाम. याच काळात कामदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतऋतू कामदेवाचा मित्र आहे. शुक हे त्याचे वाहन होय. दक्षकन्या रती ही त्याची पत्नी. रूपाने ती अत्यंत सुंदर, अष्टबाहू, चार हातात शंख, पद्म, धनुष्य व बाण असलेली. राहिलेले चार हात रती, प्रीती, शक्ती व उज्ज्वला या महिलांच्या शरीरावर.
दाम्पती जिवनाची अशीही कहाणी
No comments:
Post a Comment