Saturday 13 February 2016

रोमॅन्टीक वसंत पंचमी

व्हाट्सप गृपमधील त्याच त्या शिळोप्याच्या गप्पांना फाटा देत, वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आयुष्यातील प्रणयाराधनेचे काही प्रसंग जळगावमधील मान्यवरांनी एकमेकांना शेअर केले. वसंत पंचमी उत्सवाचा हर्षोल्हास काही मिनिटे, सेकंदासाठी सर्व सदस्यांनी अनुभवला. प्रत्येकाच्या मनात पत्नी विषयी असलेले हवळेपण आणि हिरवेपण शब्दांच्या मांडणीतून जाणवले. एक वसंत पंचमी रोमॅन्टीक करणारी ही २४ पात्रांची कहाणी...





शेकडोंच्या भाऊगर्दीत आमचाही एक व्हाट्स ऍप गृप आहे. ‘कान्हदेश मंचगृप. तीनवर्षे तो सुरळीत सुरु आहे. मध्यंतरी दोनवेळा गृपचा संसार मोडला. अनेक सदस्य इतर गृपच्या घरोब्याला गेले. पण, ‘कान्हदेश मंचची सर काही आली नाही. मग एखादी खाष्ट सासू दरडावून, दटावून किंवा कधी प्रेमाने संसाराला पुन्हा लागा असा सल्ला देते आणि दुरावालेल्या दोघांचे एकत्र नांदणे सुरू होते तसे १०० जण आम्ही पुन्हा एकत्र आलो. विविध क्षेत्रातील जवळपास ६०/६५ पुरुष आणि ३५/४० महिलाकान्हगृप मंचच्या सदस्य आहेत.
तरुणाईतव्हेलंटाईन डेचा माहौल असतानाकान्हदेश गृपमध्ये चर्चा सुरु झाली पारंपरिक वसंत पंचमीची. कधीकाळी वसंत पंचमी हा उत्सव भारताचा सांस्कृतिक जनउत्सव होता. इतिहासात संदर्भ मिळतोकी१७,००० वर्षांपूर्वी भारतीय प्रेमसंगम महोत्सव म्हणजे वसंत पंचमी अर्वस्थान (अरबस्तान) ते कंबोजद्वीप (कंबोडिया) अशा आर्यावर्तात साजरी होत असे, अरबस्तानात आजही हा उत्सवजश्न बहारया नावाने साजरा होतो. म्यानमार (ब्रह्मदेश) ते कंबोडिया येथेउत्सवो बीसुंतीम्हणून साजरा होतो. भारतीय मंडळी मात्र, या उत्सवाला विसरूनव्हेलंटाईन डेच्या चक्रात अडकली आहे.

कान्हदेश मंचमध्ये आम्ही वसंत पंचमी साजरी करण्याच्या दोन मुलभूत कल्पना घेतल्या. पहिली होती प्रोफाईल फोटो पती-पत्नीचा सेल्फी म्हणून शेअर करणे. दुसरी कल्पना भन्नाट होती. आपल्या आयुष्यातील प्रणय, रोमान्सचा एखादा प्रसंग शेअर करणे. अर्थात, पहिली भेट, पहिली गिफ्ट किंवा सहवासातील प्रसंग असा हलका फुलका प्रसंग हवा होता. प्रोफाईल फोटो अनेकांनी बदलले आणि लक्षात आले, गृपमध्ये विश्वासाचे नाते असेल तर सदस्य खासगी गोष्टीही शेअर करतात. एकाने मनातले सांगितले की, दुसराही रांगेत असतो. मग काय, वसंत पंचमीच्या मुहूर्तावरकान्हदेश मंचचा गृप रोमॅन्टीक मूडमध्ये गेला. पतीने भरभरून पत्नी विषयी तर पत्नीने पतीविषयी नाजूकपणे भावना व्यक्त केल्या.

या सर्व प्रतिक्रिया उत्स्फूर्त असल्या तरी फमिली कौन्सिलिंगसाठी समर्पक आणि परिपूर्ण उदाहरणे आहेत. अनेकांच्या कथनातला टोन हा कन्फेशनचा आहे. मात्र, यात समाधान, आनंद आणि समर्पण आहे, पश्चाताप नाही हे मुद्दाम नमुद करायला हवे. मी मात्र थोडी सभ्यता मोडून काही मान्यवर सदस्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांतसेन्सारकरून इतरांनाही शेअर करीत आहे. खरेतर हा प्रयोगजीवन आनंदशोधनम्चाच प्रकार आहे. चला तर डोकावू या इतरांच्या रोमॅन्टीक आयुष्यात...

डॉ. महेंद्र - डॉ. ममता काबरा
सायकलची सवारी
माझ्या आयुष्यात पत्नी सोबतचा सर्वांत रोमॅन्टीक प्रसंग हा सायकल सवारीचा आहे. आम्ही तेव्हा कासोद्यात राहत होतो. बायकोसोबत घराबाहेर जाणे हाच विषय तेव्हा रोमान्सचा असे. जळगावला सोबत येणे म्हणजे वसंत पंचमीच, एकदा जळगावला यायचे होते. कार नादुरुस्त होती. मोटारसायकल भावाने नेली होती. पण, मिळालेली संधी सोडायची नाही हे लक्षात घेवून मी आणि ममता चक्क सायकलवर जळगावी आलो. सकाळी १० ते रात्री १० चा आमचा प्रवास सर्वार्थाने रोमॅन्टीक होता. बहुधा १९८६ मधला प्रसंग आहे. माझी आणि ममताची पहिली भेट मेहरुण तलावावर झाली होती. त्याची आठवण म्हणून तलावाकाठी आम्ही १९९९ मध्ये प्लॉटही घेतला.
(होमिओपॅथी पांढरे डाग निर्मूलन तज्ञ)

गिरीश - सौ. आदीती कुळकर्णी
घराची मुख्य कार्यकारी अधिकारी
आमचे लग्न झाले त्यावेळी मी जळगाव जनता बँकेत नोकरीला होतो. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आम्ही दोघे एकत्र आलो. टिपिकल मानसिकतेप्रमाणे बँकेतला नवरा म्हटले की, ऊन ऊन खिचडी, साजुक तूप कवितेप्रमाणे मजा वगैरे असे तिला वाटले. प्रत्यक्षात होते वेगळेच !
वयाच्या ३८ व्या वर्षी बँकेची नोकरी सोडून सामाजिक कामात जायचे ठरविले. तिला निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले. माझे आदर्श स्व. डॉ. अविनाशदादा आचार्य माजी कुलगुरू डॉ. के. बी. अण्णा पाटील यांच्याशी तासभर चर्चा केली निर्णय पक्का झाला.
एकत्रित कुटुंबात सर्वांना सांभाळणे संबंध दृढ करणे आजच्या काळात कठीण असताना ती ते काम माझ्यापेक्षा अधिक चांगले करते. देणे-घेणे हा विषय तिच पाहते. आमच्या घरातील सर्वच जण माझ्यापेक्षा तिच्याशी बोलणे अधिक पसंत करतात.
मी खुप वेळेस बाहेरगावी असतो त्यावेळी एकटे राहावे लागते. त्यामुळे छान झोप होत नाही आणि मी घरी असलो तरी रात्री उशीरापर्यंत घरात खुडखुड चालु असते त्यामुळे छान झोप होत नाही.
या उदाहरणांवरुन मला एवढेच सांगायचे आहे, की ती खुप समंजस आहे, त्याचा मी काही वेळेस गैरफायदा घेतो. ती गृहिणी असली तरी ती माझ्या घराची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. मी भाग्यवान आहे असेच म्हणावेसे वाटते.फकधी कधी मला प्रश्न विचारते लग्न का केलेत? अटलबिहारी वाजपेयींसारखेच राहिला असता !
(संचालक, आशा फाऊंडेशन)

डॉ. राजेश - डॉ. सिमा पाटील
आयुष्यात सुखद अपघात
माझी कहाणी थोडी वेगळी आहे. मेडिकल कॉलेजात सांस्कृतिक प्रतिनिधी असताना ज्युनियर बॅचच्या प्रत्येकाचा सहभाग असावा म्हणून सिमा चुकून नाटकात काम करती झाली. नाटकात माझी हिरॉईन वेगळीच होती. पण, माझ्या आयुष्यात हा सुखद अपघात घडला. सुरुवातीला सहज म्हणून बघू टाईमपास असे म्हणणारा मी रोजच तिच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू पाहात प्रेमात इतका गुरफटलो, की माझे मलाच कळले नाही. १८ फेब्रुवारीला आमच्या प्रेमाला २५ वर्षे होतील. अजुनही रोज प्रेमात पडण्याचा माझा नित्यकर्म सुरुच आहे.
तिचा प्रचंड आत्मविशवास, दांडगी इच्छाशक्ती प्रामाणिक, निर्मळ निर्भिड स्वभाव यामुळेच मी घडत गेलो. अन्यथा माझ्यासारख्या स्वच्छंदी, अतिभावनिक अव्यवहारी माणसाबरोबर संसार करणे इतर उच्चशिक्षीत स्त्रीला जमणे अशक्य होते. मराठवाड्याच्या सधन कुटुंबात वाढलेल्या सिमाने माझ्या सहीत  संपूर्ण कुटुंबीय नातेवाईकांना देखील आपलसे केले. वादविवाद कितीही झाले तरी प्रेम दिवसागणिक वर्षागणिक वाढतेच आहे. मला नेहमी म्हणावे वाटते,
मेरे रंग में रंगनेवाली, परी हो या हो परीयों की रानी, या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का...जबाब दो, दो ना !
(सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ)

शंभूअण्णा - सौ. सोनाली पाटील
आज थोडा रूमानी हो जाए !
सोनाली आणि मी लग्न होवून २४ वर्षे झाली. म्हणजे २४ वर्षे तर सोबत आहोतच, त्या पूर्वीची वर्षे मोजत नाही. कारण आम्ही सोबत राहत नव्हतो पण २८ वर्षे झाली आमची सोबत आहे.
मी तसा काही कर्तृत्ववान, बुद्धिमान, यशस्वी वगैरे माणूस नाहीसर्वसामान्य, चारचौघासारखा. काहीसा आक्रमक, रांगडा, थोडा  कलावंत, थोडा व्यावसायिक आणि सगळच अनिश्चित असलेला. असा माणूस सांभाळण हे सोप नाही. पण, हे सगळ सोनालीने इतक्या शांतपणे आणि सहज केले आहे, की मी काय बोलू आणि काय लिहू ?
आदर्श मूलगा, आदर्श बाप किंवा पती यातल मला काही जमल नसेल. पण, माझी पत्नी नक्की आदर्श पत्नी आणि सर्वोत्तम जोडीदार आहे. ह्यात सगळ आल. ती एकदम श्रद्धाळू तर मी टोकाचा नास्तिक. ती व्यवहारी तर मी तसा अव्यवहारीती एकदम समतोल तर मी अस्ताव्यस्त. ती काटेकोर तर मी अघळपघळ. मी नागमोडी तर ती सरळ सरळ. मी हट्टी ती क्षमाशील. मी उद्दाम तर ती स्वीकारशील. पण तरी आमची केमेस्ट्री उत्तम, भौतिकशास्राचा नियम आहे, दोन विरोधी टोकात आकर्षण असते म्हणे! तरी याचे श्रेय सोनालीला. वसंत पंचमी असो किंवा व्हेलंटाइन डे हे केवळ निम्मित्त आहे.
माझ्या मनातल्या गाभार्या मधील सनातन पुरुषी, अथांग  अंधकाराला उजळून टाकणारी तिच्या प्रेमाची निरांजन मात्र सतत तेवती आहे.
(भालचंद्र नेमाडे यांची क्षमा मागून)
या विश्वभानाच्या घोंगवत्या 
समुद्रफेसात निरर्थक ठरो
तुझ्या माझ्या आयुष्याचा
सुरम्य सप्तरंगी बुडबडा
ढळो हे पहाटी पांघरलेले
दाट झाडातून डोकावणारे
रोशन सूर्य
या खिन्न विनाश तत्वात
अकाली महामेघानि
उडवलेली उग्रगंधी धूळी प्रमाणे,
साचो घरभर
तुझ्या प्रेमाची
समृद्ध अडगळ
झाल समृद्ध सार्थक
माझ जगण
फुलल आंगण
फक्त
तुझ्या असण्याने.
(नाट्यक्षेत्रातील कलांवत आणि बांधकाम व्यावसायिक)

सौ. अस्मिता - अशोक गुरव
मी तेव्हा पेईंगगेस्ट होते
प्रत्येकच बायकोला नवर्याचा अभिमान असतो. मीही त्याला अपवाद नाही. अशोक हे व्यवसायाने कर सल्लागार. सतत आकडेमोडीशी संबंध. पण बायकोला काय आवडतं हे  समजून घेऊन साथ देतो. त्याला जगण्यातलं काव्य कळतं. म्हणून मी कविता लिहू शकतेय. लग्नानंतर नोकरी करत मी एम , पीएच डी केलं. ते त्याच्या नुसत्या प्रोत्साहनानेच नाही तर परिपूर्ण साथ होती म्हणूनच. कारण या काळात घर त्याचं होतं मी पेइंगेस्ट होते. कधी कधी अपराधी वाटायचं तेव्हा माझी खंत पुसून टाकण्याची त्याचीच धडपड. घर लहानग्या मुलीची जबाबदारी त्याने मनापासून घेतली. ऊर्जाची तर तो आई पण होता त्या काळात. आज ३२ वर्षे सोबत आहोत. लग्नाला २८ वर्षे झालीत. अजूनही मैत्री टिकून आहे याचे श्रेय अर्थातच त्याचे आहे. बायकोच्या करिअर, यशात सुख मानणारा नवरा हे मी त्याच्यामुळे अनुभवतेय. बर्यावाच दिवसातही त्याचा संतुलितपणाच सार काही निभावून नेत आलाय. अव्यहारी, अती भावूक, अस्ताव्यस्तपणा हे सगळे कवीचे नैसर्गिक दोष त्याने आहे तसे मला मनापासून स्वीकारले, म्हणून मी कविता जगू शकतेय. प्रेम मैत्री या दोन्ही चाकांसह सारथी कुशल आहे म्हणून हा प्रवास हसतखेळत सुरू आहे..
तुझं माझं नातं
अपूर्व, अंतहीन
नितळ संवेदनेचं
मनाच्या गाभा-यात
नंदादीपासारखं तेवणारं..
(कवयित्री, साहित्यिक)

प्रा. सौ. शमा - सुबोध सराफ
पावसाचे गाणे                             
३४ वर्षे मैत्रीची, २७ वर्षे सहजीवनाची. सुबोधचे संपूर्ण व्यक्तीमत्व त्याच्या नावातच सामावलेले. अतिशय सुबोध. आमच्या ओळखीला निमित्त होते. एकांकिका  पावसाचे गाणे  साल १९८२. हे गाणे. हा पाऊस संपूर्ण आयुष्याचा सोबती झाला. कधी धुवॉंधार. कधी रिमझिम. आयुष्यच सुबोध झाले. आणि एन्ट्री झाली. अजिंक्यची. अजिंक्य आकाशाला गवसणी घालणारा. तर अर्णव जमीनीवर (क्रीडांगणावरही) पाय घट्ट रोऊन उभा राहणारा. दोघेही छान लिहीतात, छान वाचतात. त्यांना जो सिनेमा आवडतो तो डाऊनलोड करुन आम्ही चौघांनी एकत्र बसून परत बघावा म्हणून आग्रही असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे दोघेही छान चित्र काढतात. बापसे बेटा सवाई.
(प्राध्यापिका रोट्रीयन)

डॉ. राधेशाम - श्रध्दा चौधरी
सोशिक आदर्श पत्नी
असे म्हणतात, यशस्वी संसारासाठी त्याग, समर्पण, समंजसपणा आवश्यक असतो. पण मी तर एक तापट, हुकुमशहा, पुरुषप्रधान संस्कृतितला क्लासिकल पती. बायकोचे कौतुक करणे, मनधरणी करणे हे तर माझ्या डिक्शनरीतच नाही. हट्टी स्वभावामुळे जरी चुकीचा निर्णय घेतला तरी समर्थन करणारा. डॉ. श्रद्धा ही एका प्रथितयश डॉक्टरांची मुलगी. जिद्दीने हट्ट करुन पुण्यात वैद्यकिय शिक्षण घेऊन देखील स्वताःच्या आकांक्षा, स्वप्नाना तिलांजली देवून माझ घरट सर्वार्थाने समर्थपणे सजवणारी. संसाराच्या जबाबदारीसाठी स्वताःला वाहून घेणारी. ती एक सोशिक आदर्श पत्नी आहेराजकारणाचा तिटकारा असून देखील माझ्यासाठी घरोघरी प्रचार करण्यात धन्यता मानणारी. सकाळी वाजेपासून वाजेपर्यंत काम करणारी. दोन्ही मुलांसह विनातक्रार कुटूंब सांभाळणारी. मुले पतीसाठी आयुष्य समर्पित करणार्या  आदर्श पत्नीला आज सलाम करण्याची संधी गमावणे म्हणजे करंटेपणा होईल. व्यवसाय समाजकारण, राजकारणाच्या माझ्या प्राथमिकतेत लवकरच माझ्या पत्नीचा समावेश करण्याची सद्बुद्धी परमेश्वर मला देवो हिच प्रार्थना. परमेश्वर मला देखील तिच्यासाठी काही त्याग, समर्पण करण्याची संधी, बुद्धी देवो ही प्रार्थना. धन्यवाद श्रद्धा. माझ्यासारख्या स्वयंक्रेद्री, महत्त्वाकांक्षी, हुकुमशहा पतीला विनातक्रार झेलण्याबद्दल.
(स्त्रीरोग तज्ञ आणि राजकारणी)


सौ. भावना - दिलीप शर्मा
जिंदगी धुप तुम घना साया|
दिलीप शर्मा एक बहुतही सुलजा हुआ व्यक्तिमत्व| जिंदगीके प्रति बहुत सकारात्मक दृष्टिकोन| अति संवेदनशील| हर रिश्तेको बखुबी निभाने के आदी है| शायद इसी वजह से मेरे मायकेमें सबके चहेते है| जब हमारी शादी हुई तब मे केवल ११ वी में थी| उसके बाद मेरे पतिने मेरी पढ़ाई पूरी करवायी| बीकॉम, बीए इंग्लीश, डीबीएम, जीडीसी ण्ड , एमबीए, एम (मासकॉम) शर्त एक ही थी फेल नहीं होनी चाहिए| और मैंने हर शर्त पुरी की, उन्होने जिंदगी मे कई उतार चढाव देखे|
बहुत संघर्ष किया| और खुद को उन्होने जीरो से हीरो बनाया| लेकिन बुरे दिनों को कभी नहीं भुलाते है| शायद इसीलिये अपने पैरो को जमीं से जुड़ा हुवा ही पाते है| हमारे बच्चोंमें उनकी जान बसती है | बच्चोंके रोल मॉडेल है और फ्रेंड है | वो सदैव दक्ष और जागरुक पिता है | वे खुद सिव्हील इंजिनियर है | और उस काम की महारत उन्होने हासिल की है| पढने का शौक है | पॉलिटिक्स उन का पसंदीदा सब्जेक्ट है| ही ईज व्हेरी गुड ऑब्जर्व्हर | इंसान पहचान ने की कमाल की खूबी है|
हम दोनों की लायकींग अलग अलग है | शांत है| मुझे बोलना बहुत पसंद है| शुरू शुरूमें मुझे हमेशा टोकते थे| तुम बहुत बोलती हो और अपनी एनर्जी वेस्ट करती हो| फिर मैं १० मिनट शांत होती थी, फिर शुरू| अब उन्हे आदत हो चुकी है | अब शांत होती हूँ तो दस बार पूछते है तबियत तो सही है ?
(जाहिरात विभाग व्यवस्थापक आणि प्राडक्ट मार्केटींग)

हेमंत - सौ. गायत्री अलोने
तुज संग प्रीत लगाई सजना...
धुळ्याच्या एसएसपीव्हीएस महाविद्यालयात एफवायबीएला प्रवेश घेतल्यावर माझी गायत्रीशी ओळख झाली. आम्ही एकाच वर्गात. ओळखीचं रूपांतर सुरवातीला एकतर्फी आकर्षणात झालं. मग कॉलेज सुटल्यावर सायकलीवर मागे मागे जाणं, गरज नसतांना वही, पुस्तक मागणं, बोलण्याचे, सहवासाचे प्रसंग शोधणं हे सुरु झालं. घरातलं वातावरण तसं मोकळं असल्याने फार भीती नव्हती. पण जातीची भिंत उभी राहील का ही भीती होतीचं. मी व्यक्तिशः जात पात हा मुद्दा कधीही मानत नाही, पण कदाचित घरातून हा मुद्दा आला असता ही भीती होतीच. एकेदिवशी कॅटलॉग भरत असतांना कळलं आम्ही स्वजातीयच आहोत! मग काय प्रयत्नांना अधिक बळ मिळालं आणि वेगही आला. साधारणतः सहा महिन्यांच्या एकतर्फी प्रयत्नांना यश आलं. धुळ्याच्या मालेगाव रोड वरील विठ्ठलाच्या मंदिरात मित्रांसोबत पहिली थेट भेट झाली. लग्न करणार आहे ना? तिचा सरळ प्रश्न. मी पुन्हा उडालो. घरून काही प्रॉब्लेम येणार नाही, जातीचीही अडचण नाही, मी सांगितलं. जात पाहून प्रेम करतो? तिचा तीक्ष्ण प्रश्न. खजील झालेला मी कसातरी पटवून देत होतो.
झालं, एकदाचं पक्कं झालं, सार्या कॉलेजात आमची जोडी फेमस. नंतर घरी कळालं. अशा गोष्टी अवेळी घरच्यांना कशा कळतात हे अजूनही समजलेले नाही! थोडा खडखडाट झाला पण घरच्यांनी आमचं नात स्विकारलं. मग मुलगी बघणं, प्रचलित बोलणी, साखरपुडा, लग्न, पंगती सारं काही वेल रेन्ड झालं. एकूणच सुरुवातीला लव्ह मैरेज असलेलं आमचं लग्न शेवटी रेन्ज झालं.
काही महिन्यातच गायत्री घरातील सर्वांच्या गळ्यातील ताईत झाली, आई वडिलांची विश्वासू मुलगी तर लहान भावांची वहिनीपेक्षा मैत्रीण अधिक झाली. २००१ साली जळगावला बदली झाली. दोन तीन महिने एकटे काढल्यावर आई वडिलांच्या आग्रहाखातर फॅमिली शिफ्ट केली. ,००० चौरस फुटाच्या घरातून १० बाय १० च्या खोलीत आलो, पण गायत्रीने कधी एका शब्दानेही तक्रार केली नाही. स्वतःचे घर असावे अशी तिची इच्छा होती, मला मात्र कॉन्फिडन्स नव्हता, शेवटी आई वडील आणि गायत्रीनं अर्धे जळगाव पिंजून काढले आणि महाबळ परिसरातील तिवारी नगरात डुप्लेक्स घर घेतलं. स्वतःचं घरटं हा प्रत्येक स्त्रीचा प्रचंड आत्मीयता आणि संवेदनशील विषय असतो.
लग्नापूर्वी तिच्या सोबत फिरण्यासाठी तासनतास काढणारा मी लग्नानंतर प्रोफेशनली खूप बिझी (?) झालो. सकाळी ११ ते सायंकाळी आणि रात्री ते दीड, दोन, अडीच. असे माझ्या कामाचे स्वरूप. खरं म्हणजे माझे कार्यालयीन सहकारी इतके तय्यार आणि कामाप्रति प्रामाणिक आहेत की मी रात्री ऑफिसला गेलो नाही तरी काहीच बिघडणार नाही, पण उगीचच अती काळजीपोटी मी नित्यनियमाने हे वेळापत्रक पाळत असतो. यामुळे तिच्यासह सायंकाळी कुठे फिरायला जाणं, नाटक सिनेमाला जाणं, कोण्या नातेवाईक, मित्रांकडे जाणं असे प्रसंग क्वचितच अनुभवलेत. २० वर्षांच्या सहवासात एकदा १० दिवसांसाठी काश्मीर आणि एकदा दिवसांसाठी शेगाव एव्हढंच काय ते फिरणं. माझ्या नातेवाईकांना मी फार वेळ देऊ शकत नाही, पण गायत्री ती जबाबदारी चोख पार पाडते.
नातेवाईकांची लग्ने, कार्य, देणे घेणे याची जबाबदारी तिनं लीलया पेलली आहे. घरात वेळ देण्यावरून सुरुवातीला बर्याच वेळा खाट-खुट झाली, पण नंतर तिनं ते स्वीकारलं. तिच्या सोबत असतांना सतत येणारे फोन (कार्यालयीन बरं का) ते अटेंड करतानाचा माझा उत्साह, सूचना देताना हरवलेला मी, हे पाहून तिनेच सुधारणा केली, तुम्ही ऑफिसातच बरे असे म्हणून मला कौटुंबिक जबाबदार्यांमधून सुट्टी दिली. मुलगा रोहित आणि मुलगी सायली यांचं संगोपन खर्या अर्थानं गायत्रीनंच केलं, फक्त पैसे देण्याचं तांत्रिक काम मी करत आलो आहे. पत्रकारिता हे क्षेत्र आणि त्यातल्या त्यात संपादकपद हे बाहेरच्यांना मनभावन वाटत असलं तरी त्याची दुसरी बाजू असतेच. कामाचा अती ताण, काही वेळा इथिकस बाजूला ठेऊन घ्यावे लागणारे निर्णय, वेळेचे गणित बसवताना बिघडलेले संतुलन यामुळे ताण वाढतो. अर्थात हा ताण रिलीज होण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे घर. अनेकवेळा गायत्रीला मुलांच्या आईसोबतच बापाचीही भूमिका वठवावी लागते. तिनं मला काय दिलं याची हजार उदाहरणं सांगता येतील पण मी तिला काय दिलं याचा सारीपाट मांडण्याची हिम्मत होत नाही, कारण निष्कर्ष माहीत असतात!
प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, समाजात वावरण्याचा एक मुखवटाही असतो, ऑफिसमधील प्रेमळ नाना, समाजातील मदत करणारा संपादक पण घरातील माझा चेहरा तिलाचं ठाऊक असतो. माझ्या त्या चेहर्यासकट, दोषांसकट मला सर्वार्थाने स्वीकारणार्या माझ्या पत्नीचा मला अभिमानच नाही तर अप्रूपही आहे. जगातल्या बहुतेक   स्त्रियांचा एक दावा असतो, ममी होती म्हणून टिकली...दुसरी कोणी असती तर केव्हांच सोडून गेली असतीफ गायत्रीलाही असे वाटत असेल तर त्यात तिची चूक काय? असो... निस्सीम प्रेमानं तिनं माझं जगणं समृद्ध केलं आहे. कठीण प्रसंगी तिच्या पदरात आईच्या कुशीप्रमाणेच धीर मिळतो, मोहाच्या क्षणांवर विजय मिळविण्याची प्रेरणा मिळते, पत्नीपेक्षा एक मैत्रीण असल्याची अनुभूती मिळते... प्रणय याहून वेगळा काय असतो?
(दै. देशदूतचे संपादक)

अनिल - सौ. कांचन कांकरिया
प्रभातची ती कोल्ड कॉफी
गृपमध्ये सुरू असलेली वसंत पंचमी आणि त्या अनुषांगाने चर्चा कौटुंबिक गंमत पुन्हा अनुभवायला लावणारी आहे. मला आठवते एक तीन वर्षांपूर्वी व्हेलंटाईन डे होता. मला दुपारी अचानक आठवण झाली. मी घरी पत्नी सौ. कांचनाला फोन केला. तू प्रभातमध्ये ये आपण कोल्ड कॉफी प्यायला जावू. आज आपण कॉलेजच्या मुलांसारखे जावू. तेथे नो फॅमिली टॉक. अर्थात, सौ. कांचन तेथे आली. मी आणि ती अर्धातास जवळपास गप्पा केल्या. त्या सर्व आमच्या जुन्या आठवणींच्या होत्या. त्यात कौटुंबिक विषय नव्हते. आज मी वयाच्या ५८ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. लग्नाला जवळपास ३५ वर्षे झाली. अशा एखाद्या प्रसंगातून होणारी जुन्या प्रसंगाची आठवण मनाला ताजेपणा देते. इतर गृपमेंबर्सनेही आपल्या आठवणी निश्चित शेअर कराव्यात.
(नवजीवन सुपर शॉपचे संचालक)

यजुर्वेंद्र - सौ. मानसी महाजन
तीने मला स्वीकारले आहे
पत्नी सौ. मानसी माझ्यासोबत नेहमी असते.मी व्यावसायिक आणि सामाजिक कामात खुप व्यस्त असतो. कुटुंबाला मी वेळ देत नाही. मात्र मानसीने मला आणि माझ्या वेडेपणाला स्वीकरले आहे.
(दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक)

गुरदीप सिंग - सौ. इशा आहलुवालिया
ती कधीही तक्रार करीत नाही
आमचे लग्न २००८ साली झाले. साखरपुडा झाल्यानंतर  फक्त महिन्याने जुलै २००७ साली आईचे निधन झाले. मी वर्षाचा असताना वडीलांचे छत्र हरपले होते. पहिली मुलगी बघितली आणि तिलाच पसंत केले. तिचे शिक्षण एम कॉम, बीएड आहे. नोकरीच्या कामामुळे मी तिला जास्त वेळ देवू शकत नाही. पण ती कधी ही तक्रार करीत नाही. घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर आहे. आपल्या गृपमुळे पहिल्यांदा तिच्याविषय लिहतो आहे. त्याबद्दल आपण सर्वाचे आभार.
(प्रॉटक्ट, ब्राण्ड, मार्केटींग अभ्यासक)

ज्ञानेश्वर - डॉ. तृप्ती बढे
घरातले चालते बोलते मैनेजमेंट
दिसलीस...तू...फुलले ऋतु. मागील वर्षीच लग्नाला एक तप पूर्ण झाले. मी रिलायंसला असताना वधू संशोधन सुरू झाले. सहा बहीणीनंतर मी. सहा बहीणींकडे सहा स्थळे. एकीला होकर दिला तर पाच नाराज ? माझे बालपण विदर्भात गेले असल्याने मोर्चा वाशिमला वळला. संसाराला सुरूवात झाली. तृप्तीने एमडी लग्नानंतर केले. मुले वल्लभ आणि नक्षत्रा यांच्या अभ्यासाची काळजी तृप्तीलाच असते. घरातील चालते बोलते मैनेजमेंट इन्स्टिट्यूशन. माझे वजन ८५ चे ७३ केले महिन्यात. मी परिवार जोडणे आणि तिने सांभाळणे असा अविरत प्रवास ! घरात टिव्ही नसल्याने चर्चा गाणी असा भन्नाट अजेंडा असतो.   अशी घरातल्या घरपणाची सहचारी !
(संचालक, श्री सद्गुरू इनव्हेस्टमेंट कन्सल्टंट)

रमेश - सौ. माया मुणोत
एकमेकांपासून लांब राहत नाहीत
लग्न मंडपात डोक्यावर अक्षता पडेपर्यंत मी मायाला पाहिले नव्हते. १९७१ मध्ये लग्न झाले. छोट्या घरात किचन ओटा केला. तेव्हा ओट्याचा टॉप करताना सिमेंटमध्ये काचेचे तुकडे लावून ते घासायची पद्धत होती. मी आणि मायाने रात्रभर तो ओटा घासला. माझ्या  वडीलांच्या मृत्यू प्रसंगी मी जळगावात नव्हतो. मायानेच सर्व विधी केले. जळगावमध्ये मी पहिल्यांदा व्यवसायात उतरायचे ठरविले तेव्हा मायाने सोन्याचे सर्व स्त्रीधन मला मोडायला दिले. एक कडू अनुभव आहे. माझ्या वडिलांचे अनेकांकडे काही घेणे होते. ते कोणीही मला आजपर्यंत दिले नाही. मात्र, मागण्यार्यांनी सतत पाठपुरावा केला. आम्हाला पहिले कन्यारत्न आहे. तीचे नाव मनिषा. पण मी तिला मनी म्हणतो. तिच्या पायगुणामुळे हाती पैसा आला असे मी मानतो. मी जळगावमध्ये हप्त्याने प्लॉट विक्री सुरू केली. त्यात माझ्यावर आरोप झाले. मनस्ताप झाला. मी न्यायालयात जिंकलो. पण, हा सारा त्रास पत्नीने शांतपणे सहन केला. त्याकाळात एकदन लाखांची मागणी घेवून उभे राहिले. मुलीचे लग्न धडाक्यात केले. ति विदेशात आहेत. पत्नी विदेश दोरा करून आली. मी तब्येतीमुले जावू शकलो नाही. आता आम्ही एकमेकांपासून लांब राहत नाहीत.
(संचालक, ओम साई रिअल इस्टेट, संयम ग्राफिक्स)

डॉ. रवी - डॉ. ज्योती हिरानी
आठवणींमुळे मिळते प्रेरणा
माझ्या आणि ज्योतीच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली.मी घरात सर्वांत लहान आहे मात्र, ज्योती तिच्या माहेरी सर्वांत मोठी आहे. त्यामुळे मी इकडे लाडाचा आणि ती तिकडे मानाची आहे. आमच्या मंगनी, लग्न या कार्यक्रमांच्या आठवणी नवी प्रेरणा देतात. देनंदिन जीवनात आमचेही खटके उडतात. मुलगी कुंजलमुळे आम्ही एकमेकात गुंतून राहतो. मला ज्योतीच्या कार्याचा अभिमान आहे.
(होमिओपॅथी तज्ञ आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सहप्रमुख



अनिल - निलम जोशी
आनंद अनिलमचा...!


मला आयुष्यात फार मुली बघण्याची गरज भासली नाही. एका मित्रासोबत निलमच्या घरी गेलो होतो आणि नंतर त्याने सांगितले, की मुलगी आवडली असेल तर बोलू का? मीही होकार दिला आणि पहिल्या मुलीच्या पाहण्यातच नीलमच्या साथीने  नवीन सहजीवनाची सुरुवात झाली. लग्नपत्रिका करताना जामनेरचे देशमुखकाका यांनी अनिल आणि निलमचे 'अनिलम' केले म्हणजे खर्‍या अर्थाने आम्हाला एकजीव केले, आणि त्यावेळी ते खूप स्मरणात राहिले. काहींना ते अजूनही स्मरते.  तिचे शिक्षण  एमबीए  झाले आहे. माहेरी बर्‍यापैकी कोड कौतुकात वाढलेली अन माझी उमेदीची वर्षे सकाळमध्ये त्यामुळे काम न काम, वेळी अवेळी येणे, रात्रंदिवस फोन घेणे परंतु निलमने सर्व समजून घेतले. आमच्या सर्वांच्या दृष्टीने काही काळ आरोग्याच्या तक्रारीचा गेला पण तिच्या खंबीरपणामुळे सर्व संकटे दूर गेलीत. ती पहिल्या पासून जॉब करते आणि तिच्या प्रयत्नामुळे ती आज बँकेत मॅनेजर आहे याचा अभिमान आहे. आम्हाला दोन मुली त्याही खूप लकी आहेत. दुसरी मुलगी झाली त्यावेळी खूप लोकांनी सांगितले की, आधी चेक केले असते तर बरे झाले असते. परंतु, आम्ही दोघेही आनंदी होतो आणि आहोेत. घरातील आणि माझ्या  जीवनातील अनेक चढ उतारात ती सखी म्हणून वावरते आहे. आई बाबांना शेवटपर्यंत सांभाळणार हे वचन आधी घेतले होते, त्याचे मनस्वी पालन ती करते आहे याचा आनंद आहे. अनेक अडचणींच्या वेळी साथ दिली आणि देत आहे. ती   नोकरीला असूनही मुलींच्या प्रगतीत तिचाच हातभार आहे. नोकरीच्या व्यस्ततेतही तिने घरातले घरपणं जपलं आहे. आधीच्या २० वर्षांच्या नोकरीत कार्यबाहुल्यामुळे तिची स्वप्न पूर्ण करता आली नाहीत आता त्या स्वप्नपूर्तीची सुरुवात केलीय. १६ वर्षाचे सहजीवन यापुढेही तिच्या साथीने ऊत्तम  राहील याचा विश्वास आणि खात्री आहेच...!  

(महा व्यवस्थापक, देशदूत, जळगाव)



No comments:

Post a Comment